Monday, 24 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक १० वा

सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः
प्रपञ्चं सिञ्चती पुनरपि रसाम्नाय-महसः ।
अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं
स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि ॥ १० ॥


हे मातः चरणयुगलान्तर्विगलितेः सुधाधारासारैः प्रपञ्चं सिञ्चन्ती रसाम्नायमहसः (सकाशात्) स्वां भूमिं पुनः अपि अवाप्य भुजगनिभं अध्युष्टवलयं स्वं आत्मानं कृत्वा कुलकुण्डे स्वपिषि" आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या दोन्ही चरणकमलांतून स्रवणाऱ्या अमृताच्या धारावृष्टींनीं तूं देहांतील सर्व नाड्यांच्या समूहाला आणि नाड्यांच्या द्वारा देहालाही पण शिपडतेस, तृप्त करतेस, त्यांचें पोषण करतेस आणि त्यानंतर पुन्हा चंद्रमंडलांतून खाली उतरतेस. आपल्या पहिल्या स्थानाला येतेस. तेथें सर्प जसा वेटोळें घालून बसावा त्याप्रमाणें तूं स्वतःचें (साडेतीन) वेटोळे करून कुंडाप्रमाणे असलेल्या आधारचक्रांतील कुहरांत अर्थात् छिद्रामध्ये पूर्वीप्रमाणेच झोंपतेस. तात्पर्य, लोकोपकाराकरितां हा तुझा सर्व खेळ चालला आहे ! असा या लोकाचा अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत कुंडलिनीरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी क्रमशः पृथ्वी, जल इत्यादि तत्त्वांचा लय करीत मस्तकामध्यें असलेल्या हजार पाकळ्यांच्या कमलांतील चंदमंडलामध्यें विहार करते असें सांगितलें. आतां या श्लोकांत ती त्या चंद्रमंडलांतील आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अमृताच्या वृष्टीने साधकाच्या देहांतील सर्व नाड्यांना व नाड्यांच्या द्वारा साधकाच्या शरीरपिंडालाही तृप्त करते, पुष्ट करते आणि पुन्हा पूर्ववत् सृष्टिक्रमाच्या अनुरोधानें सर्व तत्त्वांचा आविष्कार करीत मूलाधारचक्राजवळ असलेल्या आपल्या स्थानांत स्वाधिष्ठानचक्रांत वेटोळे घालून स्वस्थ झोपते. हें सर्व तिचे कार्य साधकाच्या शरीरपिंडाचें पोषण आणि परिपालन होण्याच्या दृष्टीनेंच चाललेले असतें. जें पिंडी तें ब्रह्माडी या न्यायाने साधकाच्या शरीरपिंडाप्रमाणेंच अखिल बह्मांडाचेंही ती पोषण आणि परिपालन करीत असतेच. अशा या तिच्या दयापूर्ण लीलेचें वर्णन आचार्य करीत आहेत.

आपल्या शरीरांत एक सहस्रदल कमल आहे. ज्याला आपण व्यवहारामध्ये मेंदू, मगज अथवा मस्तिष्क म्हणतो तेंच हें सहस्रदल कमल होय. हें सर्व तत्त्वांचे बीजस्थान आहे. सर्व तत्त्वांचा लय यांतच होत असतो. हेंच सच्चिदानंदरूप महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. श्रीविद्येच्या ध्यानात्मक समाराधनेमध्यें या सहस्रदलकमलाला श्रीचक्र असेंच म्हटलेले आहे. नामरूपात्मक विश्वप्रपंचाचीं मूळ बीजभूत असलेली अक्षरें आणि तत्त्वें ही बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच या ब्रह्मरंध्रस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलरूपी श्रीचक्रांतही अंतर्भूत झालेलीं आहेत. शक्तितत्त्व हें वाक्प्रपंचाचें उगमस्थान आहे तर शिवतत्त्व हें अर्थप्रपंचाचें उगमस्थान आहे. शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच या दोन्ही प्रपंचाचे मूळ अक्षरांतच असल्यामुळें श्रीचक्रांतील सर्व त्रिकोणांत आणि कमलदलांत आपल्याला अक्षरांचाच विन्यास दृष्टीस पडेल. श्रीचक्र हें शिवशक्तिस्वरूप पूर्ण तत्त्वाचें अधिष्ठान असल्यामुळें श्रीचक्रांत आपल्याला शिवचक्रांचा आणि शक्तिचक्रांचाही एकत्र समावेश असलेला दृष्टीस पडतो. आपल्या घराला सर्व बाजूंनी जसा परिघ असावा किंवा कुसूं असावें त्याप्रमाणे श्रीचक्रांत आपल्याला बाहेरून आंत प्रवेश  करतांना पहिल्या प्रथम तीन रेघांचा चतुष्कोण दिसेल. यालाच भूपुर असें म्हणतात. या भूपुराला चार द्वारे आहेत. तीं क्वचित उघडी असतात तर क्वचित भूपुरांशीं अखंडपणें संलग्न असतात. आपण भूपुरांत प्रवेश केला कीं, त्या ठिकाणी कांहीं भाग मोकळा दृष्टीस पडेल. त्यापुढे आपल्याला तीन वर्तुळे दिसतील. अर्थात् तीन वर्तुळाकार रेघा दिसतील. कांहीं ठिकाणी त्या चारही असल्याचे दिसते. सर्वत्र विकल्प हा मतभेदामुळे अथवा संप्रदायभेदामुळें असतो ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ही तीन वर्तुळे जणु कांहीं बाह्य विश्वाच्या त्रैगुण्याची द्योतक आहेत.

या वर्तुळांच्या आंत षोडशदल कमल आहे. त्याच्याही औत एक अष्टदल कमल आहे. षोडशदळकमलातील प्रत्येक पाकळीत अं, आ इत्यादि सोळा स्वरांची बीजे लिहिलेली असतात. श्रीचक्र आपल्या हातावर घेऊन पहा. त्यांत आंतल्या बाजूला असलेल्या भूपुराच्या द्वारामध्ये जें दल येईल त्यांत अं हें बीज दिसेल. पुढें उजवीकडून उलट्या बाजूनें प्रत्येक दलांत आ, ई इत्यादि स्वरबीजे पृथक पृथक् लिहिलेली असतात. याप्रमाणे सोळा दलांत सोळा स्वर पूर्ण होतात.

षोडशदल कमलानंतर आपल्याला आंतल्या बाजूस अष्टदल कमल दिसेल. पुढच्या बाजूस ऊर्ध्वमुरव त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलात क - वर्गातील बीजाक्षरें सरळ क्रमाने लिहिलेली दिसतील. आपल्या बाजूस असलेल्या अधोमुख त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलांत ट - वर्गांतील बीजाक्षरें लिहिलेली असतात. उजवीकडींल दलांत च - वर्गाचीं बीजाक्षरें लिहितात, तर डावीकडील दलात त - वर्गाची बीजाक्षरें लिहितात. उजव्या बाजूकडील वरच्या कोपऱ्यांतील दलांत प - वर्गातलीं बीजाक्षरें पहावयास सांपडतील तर खालच्या बाजूच्या कोपऱ्यांतील दलांत य - वर्गातील चार बीजाक्षरें लिहिलेली दिसतील. त्याचप्रमाणें डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यांतील दलांत श - वर्गातील चार बीजे लिहिलेलीं असून वरच्या कोपऱ्यातील दलात ळं आणि क्षं ही दोन बीजाक्षरें लिहिलेली असतात. याप्रमाणे अष्टदल कमलापर्यंतची सर्व चक्रे ही शिवचक्रे म्हणून समजली जातात. या शिवचक्रांच्या आंत आपण गेलों म्हणजे आपल्याला शक्तिचक्रांचा समूह दिसेल.

आतां आपण शक्तिचक्रांचा विचार करूं. अष्टदल कमलाचे अवलोकन करून आपण आंत गेलों की, प्रथम आपल्याला सर्व बाजूंनी मोकळा असलेला बराच मोठा वर्तुळाकार प्रदेश दृष्टीस पडेल. या प्रदेशांत अनेक त्रिकोणांनी संलग्न असलेली पांच चक्रें आहेत. पांचवे चक्र केवळ त्रिकोणात्मकच आहे. यांत पहिलें चक्र चौदा त्रिकोणांचे आहे, तर त्याच्या आंतील दोन चक्रे ही दहा-दहा त्रिकोणांची आहेत. त्यांच्या आंतील एक चक्र आठ त्रिकोणांचे असून त्याच्या आंत शुद्ध त्रिकोण दिसत आहे. पहिल्या चौदा त्रिकोणांच्या चक्राला "चतुर्दशार" असें म्हणतात, तर त्याच्या आतील दहा-दहा त्रिकोण असलेल्या दोन चक्रांना क्रमशः  "बहिर्दशार" आणि "अन्तर्दशार" असे म्हणतात. त्यांच्याही पलीकडे असलेल्या आठ त्रिकोणांच्या चक्राला अष्टकोण अथवा वसुकोण अशीं नांवे दिलेली आहेत. त्याच्याही आंत आपल्याला शुद्धत्रिकोण पहावयास सापडेल. या त्रिकोणात्मक चक्रांत दुसरा कोणताही त्रिकोण घटक झालेला नाहीं. म्हणून या चक्राला शुद्धित्रिकोण असेंच म्हटलें जातें. चतुर्दशार चक्रामध्यें खालच्या बाजूला जो त्रिकोण आहे त्यांत कं हें बीजाक्षर असून क्रमाक्रमाने उजवीकडून डावीकडे खं, गं या क्रमाने ढं पर्यंत चौदा बीजाक्षरें आहेत. त्याचप्रमाणे बहिर्दशारचक्रांतील दहा त्रिकोणांत खालच्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे णं-पासून भं-पर्यंत दहा बीजें लिहिली जातात, तर अंतर्दशार चक्रांतील दहा त्रिकोणांत मं पासून क्षं पर्यंत असलेलीं दहा बीजे लिहिलेली दृष्टीस पडतात. आपल्या देहांतही मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जी सहा चक्रें आहेत त्या चक्रांच्याही दलांत सर्व स्वर आणि व्यंजने बीजरूपानें समावलेलींच आहेत. म्हणून कुलपथांतील अर्थात् सुषुम्नामार्गांतील षट्चक्रे आणि श्रीयंत्रांतील चक्रें ही एकरूपच समजली जातात.

मूर्धस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलांतही श्रीचक्राची भावना केली जाते. या श्रीचक्रांतही स्वरवर्णात्मक मातृकाबीजांची स्थापना केलेली असतेच. या मूर्धस्थानी विलसत असलेल्या सहस्रदलकमलांतील श्रीचक्रांत सर्व कलांनी परिपूर्ण असलेले, वृद्धिक्षयविरहित आणि निष्कलंक असें एक चंद्रमंडल आहे. श्रीचक्रांतील त्रिकोणांत मध्यवर्ती जसा बिंदु आहे त्याचप्रमाणें हा पूर्ण चंद्र सहस्रदल कमलांतील श्रीचक्रांत विराजमान झालेला आहे. या पूर्ण चंद्रांतच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही मंगलमय शिवततत्त्वाशीं समरस होऊन विहरत असते. याच वेळेला तिच्या चरणकमलाच्या स्पर्शानें स्पंदित झालेल्या चंद्रमंडलातून अमृताचा स्त्राव होत असतो व त्या अमृताने शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांबरोबर देहाचेंही परिपोषण होत असतें असा योग्यांचा व तांत्रिकांचा सिद्धान्त आहे.

श्रीचक्रांतील मूलभूत मध्यवर्ति असलेल्या त्रिकोणाच्या बाहेर जे आठ त्रिकोण असलेलें चक्र आहे, ज्याला "अष्टार" किंवा वसुकोण अथवा अष्टकोणचक्र म्हणतात, त्या चक्रांत आपल्या बाजूला अधोमुख असलेल्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे उलट्या क्रमाने प्रत्येक त्रिकोणांत मंत्रस्वरूप वाग्देवतांची बीजें स्थापन केलेली असतात. तीं क्रमाने र्ब्लूं, न्व्लीं, य्लूं, ज्र्मीं, ह्स्ल्व्यूं, झ्म्य्र्‌रूं, क्ष्म्रीं अशी आहेत. या अष्टारचक्राच्या आंत असलेल्या त्रिकोणांत आपल्या उपास्य देवतेचा पंचदशाक्षरी महामंत्रराज विराजमान झालेला आहे.

देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळावा श्लोक पहा. या त्रिकोणांतही मध्यवर्ती असलेला बिंदू हा पूर्ण अर्थात् पोकळ स्वरूपाचा असून त्यामध्ये महामंत्रराजाच्या अंतिम बीजानें घटित असलेला "ॐ ईं ईं नमः" हा मंत्रच तादात्म्यभावाला प्राप्त झालेल्या शिवशक्तीच्या रूपाने विलसत आहे. उपासनाबलानें येथपर्यंत पोहचलेल्या साधकाच्या आनंदाला पारावार उरत नाहीं.

हें सर्व अंतर्गत व बहिर्गत श्रीचक्रसमाराधनेचें स्वरूप आणि फल लक्षांत घेऊन आचार्य या श्लोकाने वस्तुस्थितीनें श्रीललिता महात्रिपुरसुंदरीचें वर्णन करीत आहेत. आई जगज्जननी ! तुझे चरणकमल हें खरोखर अमृताचा वर्षाव करणारे आहेत. त्या अमृताच्या वृष्टीने तूं व्यष्टी आणि समष्टीच्या विश्वप्रपंचाचें सिंचन करतेस. "रसाम्नायमहसः" रसाम्नायमहस् शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. कारण तेथें रसाची - अमृताची पूर्ण अभिवृद्धि असते. आम्नाय शब्दाचा अर्थ जसा वेद आहे तसाच अभिवृद्धि असाही पण आहे. ज्याच्यामध्ये अमृताची पूर्ण अभिवृद्धि आहे असा 'महस्' म्हणजे तेजोमय अथवा कांतिरूप असलेला चंद्र, त्या चंद्रांतून अमृताचा वर्षाव होतो व त्या वृष्टीनें साधकाच्या सर्व नाड्यांचे व देहाचेंही पोषण होत असतें. हें सर्व कार्य कुंडलिनीच्या रूपाने चाललेले असतें. त्यानंतर पुन्हा ती त्रिपूरसुंदरी कुंडलिनीच्या रूपाने खालीं उतरते. पुन्हा पूर्ववत् ती आपल्या प्रदेशांत म्हणजे मूलाधारभूत चक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठानचक्रामध्यें एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून झोप घेत असते. ती तिची निदा आधारचक्राच्या मध्यभागी कुंडाप्रमाणे असलेल्या खळग्यांत तोंड घालून होत असते. त्याच ठिकाणी उगम पावणाऱ्या सुषुम्ना नाडीचाही मार्ग तिनें आपल्या मुखानें अवरुद्ध केलेला असतो. कु म्हणजे पृथ्वी तिचे लं इत्याकारक बीज तेथेंच लीन असतें. म्हणून आधारचक्राला कुल असें म्हटले आहे. त्या आधारचक्रांतला मध्यवर्ति भाग सखल असल्यामुळें त्याला कुलकुंड असे म्हणतात. त्या कुलकुंडांतही एक सूक्ष्म छिद्र आहे. त्यालाच आचार्यांनी कुहर असें म्हटले आहे. इडा आणि पिंगला यांच्यामध्ये असलेली सुषुम्ना नाडी येथूनच उगम पावत असते. निद्रिस्त असलेल्या सर्पाकार कुंडलिनीच्या मुखाने सुषुम्नेचें द्वार झाकलेले असतें. त्यामुळें प्राणवायुचा सुषुम्नेमध्यें प्रवेश होत नाहीं. जोपर्यंत सुषुम्ना नाडींत प्राणवायूचा प्रवेश होत नाहीं तोपर्यंत साधकाला अंतर्मुखता प्राप्त होत नाहीं. जोपर्यंत अंतर्मुखता नाहीं तोपर्यंत मनाला स्वास्थ्याचा लाभ होत नाहीं व जोपर्यंत स्वास्थ्याचा लाभ नाहीं तोपर्यंत समाधानही नाहीं. तात्पर्य समाधानासाठी स्वास्थ्य पाहिजे, स्वास्थ्यासाठी अंतर्मुखता पाहिजे, अंतर्मुखतेसाठी सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाणें आवश्यक आहे व सुषुम्ना नाडीच्या द्वाराचें उद्‌घाटन होण्यासाठी कुंडलिनीची जागृति होणें आवश्यक आहे. ही कुंडलिनीची जागृति श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेने घडवून आणता येते. श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीस्वरूपच आहे. तेव्हां तिची उपासना हेंच तिच्या जागृतीचे उत्कृष्ट साधन आहे यांत संशय नाहीं. कांहीं लोक "कुहरिणि" हें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेच विशेषण मानतात. कांहीं मानले तरी वर निर्दिष्ट केलेल्या अर्थाला बाध येत नाहीं. 





या यंत्रातील सहाही त्रिकोणांत ह्रीं बीज असल्याचें लक्षांत घ्यावें. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची विधिपूर्वक सहा दिवस पूजा करावी. केळांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. तांबड्या रेशमी दोऱ्यांत बाधून ते यंत्र धारण केल्यास शरीरातील तेजःस्वरूप शुक्र धातूची वृद्धि होते. षांढ्य जाते. हें सिद्ध यंत्र धारण केल्यास स्त्रियांच्या शरीरांतही रजःप्रवृत्ति निर्माण होते.

Sunday, 23 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ९ वा

महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि ।
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ॥ ९ ॥


"हे मातः त्वं मूलाधारे महीं, मणिपूरे कं, स्वाधिष्ठाने स्थित हुतवहं अपि, हदि मरुतं, उपरि आकाशं, भ्रूमध्ये मनः अपि (एवं) सकलं अपि कुलपथं भित्त्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्या सह विहरसे ।" ( एतादृशीं त्वां ये ध्यायन्ति ते धन्याः) आई त्रिपुरसुंदरी ! मूलाधारचक्रांत पृथ्वीतत्त्वाला, मणिपूरचक्रांत जलतत्त्वाला, त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्रांत असलेल्या अग्नितत्त्वालाही भेदून तसेंच हृदयाजवळ असलेल्या अनाहतचक्रांतील वायुतत्त्वाला, त्याच्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वाला आणि भ्रूमध्यप्रदेशीं असलेल्या आज्ञाचकक्रांतील मनस्तत्त्वाला भेदून, अर्थाद सर्वच कुलपथाला म्हणजे मुलाधारादि षट्चक्रांना अथवा सुषुम्नामार्गाला भेदून मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदल कमलामध्ये आपल्या परमशिवस्वरूप पतीसह तूं एकांतामध्यें विहार करतेस. तुझ्या या चिदानन्दस्वरूप अवस्थेचे जे कोणी ध्यान करतात, खरोखर ते धन्य होत. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी सरळ अर्थ आहे.

आपलः संपूर्ण देहच श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. त्यांतही विशेषेंकरून या देहांत असलेल्या मुख्य मुख्य चक्रांत तिचे प्रामुख्यानें वास्तव्य आहे. त्यांतही मुलाधारादि सहा चक्रांच्याही वर मूर्धस्थानीं विराजमान असलेलें सहस्रदल कमल हें तर तिचे अत्यंत आवडतें स्थान आहे. या देहांत श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीच्या रूपाने वास्तव्य करीत असते. कुंडलिनी ही एक विशिष्ट प्रकारची शक्ति आहे. ती प्रसुप्त असते तेव्हां इंद्रिये ही विषयोन्मुख होतात व मन विषयानंदामध्यें गर्क होत असतें. ती कुंडलिनीशक्ति जेव्हां जागृत होते तेव्हां सर्व इंद्रिये अंतर्मुख होतात व बुद्धि ही स्वतःसिद्ध, नित्य आणि निरतिशय अशा निजानंदाचा अनुभव घेत असते. "नीवारशूकवत्तन्वी कुंडली परदेवता" देवभाताच्या कुसाचा शेंडा जसा अगदीं बारिक असतो त्याप्रमाणें कुंडलिनी ही अत्यंत सूक्ष्म असून ती एक श्रेष्ठ देवता आहे असें संमोहनतंत्रांत तिचे वर्णन केले आहे.

ही कुंडलिनी मूलाधारचक्राचा आधार घेऊन स्वाधिष्ठानचक्रावर अधिष्ठित झालेली आहे. तेथें तिचे साडेतीन वेटोळे असल्याचें वर्णन करतात. नागाचें पिले । कुंकुमें न्हाले । वळण देऊनि आले । सेजे जैसे ॥ तैसी ते कुंडलिनी । मोटका औटे वळणी । अधोमुख सर्पिणी निदेली असे ॥ ( ज्ञानेश्वरी ६-१२२-१२३) मूलाधारचक आणि स्वाधिष्ठानचक्र ही दोन्हीं चक्रें अगदीं जवळ जवळ आहेत. मुलाधारचक्र हें चार दलाच्या कमलाप्रमाणे आहे तर स्वाधिष्ठानचक्र हें सहा दले असलेल्या कमलाप्रमाणे आहे. मुलाधारचक्र हे देहाच्या अगदीं मूलस्थानी म्हणजे गुदस्थानाच्या सान्निध्यांत आहे, तर स्वाधिष्ठानचक्र हे त्याच्या किंचित् वर उपस्थेंद्रियाच्या सान्निध्यांत आहे. मूलाधारचक्र हें देहांतील सर्व चक्रांचे आणि कुंडलिनीचेंही मुळ आधारभूत चक्र असल्यामुळें त्याला मूलाधार हें यथार्थ नांव आहे. त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्र याच्यांतील स्व शब्दाचा अर्थ कुंडलिनीच असल्यामुळे व तिचे तें चक्र अधिष्ठान म्हणजे वसतिस्थान असल्यामुळें त्या चक्रालाही स्वाधिष्ठानचक्र असें यथार्थ नांव मिळाले आहे. या दोन्ही चक्रांत वास्तव्य करणारी कुंडलिनी ही या प्रस्तुत सौंदर्यलहरीस्तोत्राची अधिष्ठात्री देवताच होय.

ललितासहस्रनामामध्यें "कुण्डलिनी" हें एक त्रिपुरसुंदरीचे नांव आहेच. " महासक्तिः कुण्डलिनी बिसतन्तुतनीयसी" कमळांतील तंतूप्रमाणें अत्यंत सूक्ष्म व गौरवर्ण असलेली ही कुण्डलिनी "महासक्ति" म्हणजे सर्वश्रेष्ठ सहस्रदल कमलामध्यें अत्यंत तेजस्वी असलेल्या चंद्रमंडलात शिवस्वरूपाशी समरस होऊन रहाण्याची तिला मोठी आवड आहे. अशी ती आहे म्हणूनच ती शरीरातील षट्चक्रांचे उल्लंघन करून सहस्रदल कमलामध्यें असलेल्या अमृतमंडलांत सचिदानंद परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीसदाशिवतत्त्वाशीं समरस होऊन रहाते म्हणून तिला "महासक्ति" म्हणतात. याच अभिप्रायानें कुण्डलिनीस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीला "चिच्छक्तिश्चेतनारूपा" आणि "चिदेकरसरूपिणी " अशीही नांवे दिलेली आहेत. सहस्रदल कमल हें साही चक्रांच्या वर असल्यामुळें  "षट्चक्रोपरि संस्थिता " असेही तिला म्हटले आहे.

"मूलाधाराम्बुजारूढा" "स्वाधिष्ठानांबुजगता" " मणिपूराब्जनिलया "  "अनाहताब्जनिलया" "विशुद्धिचक्रनिलया" "आज्ञाचक्राब्जनिलया" "सहसदलपद्मस्था" अशी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची ललितासहस्रनामांमध्यें नांवे आहेत. या नावांवरून ती शरीरातील सर्वच चक्रांची अधिष्ठात्री असल्याचे स्पष्टच दिसत आहे. या सर्व चक्रांत अधिष्ठित होऊन ती त्या त्या चक्रातील बीजांना, भूततत्त्वांना व देवतांना कार्यप्रवण करीत असते. ती जीवचैतन्याच्या रूपाने सर्व देहालाच जीवन देत असते. म्हणूनच तिला "प्राणदा प्राणरूपिणी" अथवा जीवा, जीवभूता असेही म्हटलें जातें. तंत्रसारग्रंथांतही मुलाधारचक्राच्या ठिकाणी इष्ट देवतास्वरूप कुंडलिनीचे एकाग्र मनाने ध्यान केंले असतां सर्व अशुभांचा निरास होतो असें सांगितले आहे. "ध्यायेत्कुण्डलिनी सूक्ष्मां मुलाधारनिवासिनीम् । तामिष्टदेवतारूपां सार्धत्रिवलयान्विताम् ॥ अशेषाशुभशान्त्यर्थं समाहितमनाश्चिरम्" मुलाधारचक्राप्रमाणेंच इतरही चक्रांत कुंडलिनीरूप त्रिपुरसुंदरीचे ध्यान केलें असतां निरनिराळी फलें प्राप्त होतात असेही सांगितलेले आहे. मूलाधारचक्र हें पृथ्वी तत्त्वाचें असल्यामुळें पृथ्वीचा धारकत्व हा गुण त्याच्यामध्ये आहे. धरा, धरित्री, धरणी अशी पृथ्वीची नावें आहेत. देहाला धारण करणारे पृथ्वीतत्त्व हें मुलाधारचक्रांत नसतें तर हा देह खाली तरी पडला असता अथवा आकाशांत तरी उडून गेला असता असे रुद्ररहस्यात म्हटलेले आहे. " सर्वाधारा मही यस्मात्, मूलाधारतया स्थिता । तदभावे तु देहस्य पातः स्यादुद्‌ग‍मोऽपि वा ॥"

स्वाधिष्ठानचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे. अग्नि हा सर्व शक्तींचे मूळ आहे. अग्नीमुळेंच देहामध्ये सर्व प्रकारची शक्ति नांदत असते. "अग्निमुलं बलं पुंसाम्" हा सिद्धान्तच आहे. कांही लोक स्वाधिष्ठानचक्र हें जलतत्त्वाचे असून मणिपूरचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे असे म्हणतात. तें कांहीं असो. आपली कुंडलिनीशक्ति ही ब्रह्मरन्ध्रांतील चंद्रमंडलाकडे जाण्यास उत्सुक झाली म्हणजे क्रमशः ती सर्व चक्रांचे उल्लंघन करीत असते. यालाच योगशास्त्रांत षट्चक्रभेदन असें म्हणतात.

माणिपूरचक्र हें दहा दलांच्या कमळासारखें आहे. मृलाधारचक्रांतील चार दलांत वं, शं, षं आणि सं अशी बीजे आहेत तर स्वाधिष्टानचक्रांतील सहा दलांत बं भं मं यं रं आणि लं अशी सहा बीजे आहेत. त्याचप्रमाणे मणिपूरचक्राच्या दहा दलांत ड-पासून फ-पर्यंतची अक्षरे बीजरूपाने रहातात. अक्षरे ही अनुस्वारयुक्त झाली कीं, त्यांना बीजांचे स्वरूप येते. मणिपूरचक्राच्या वर हृदयाच्या शेजारी असलेल्या चक्राला अनाहतचक्र असें म्हणतात. विविध प्रकारच्या अनाहत नादांना अभिव्यक्त होण्याची अवस्था याच चक्रांत प्राप्त होत असल्यामुळें या चक्राला अनाहतचक्र असें म्हटलें जातें. या चक्राला बारा पाकळ्या असून त्यांत कपातून ठ-पर्यतचीं बारा अक्षरे बीजरूपानें वसलेली आहेत. हे चक्र वायुतत्त्वाचे मानले जातें. या तत्त्वाचा भेद करून कुंडलिनीशक्तिस्वरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी वर जाते तेव्हां ती विशुद्धिचक्रांत येते. विशुद्धिचक्र हे कंठस्थानीं आहे. हें आकाशतत्त्वाचे चक्र असल्यामुळें व आकाश हें स्वभावतःच अत्यंत शुद्ध, निर्मल असल्यामुळें अथवा शुद्ध स्फटिकाप्रमाणे त्याचा वर्ण स्वच्छ असल्यामुळें या चक्राला विशुद्धिचक्र असें म्हटले जातें. या चक्राला सोळा पाकळ्या असून त्यांत क्रमशः अ-पासून अः-पर्यत सोळा स्वर विराजमान झालेले आहेत. येथूनच अक्षरप्रपंचाला मूर्त स्वरूप येतें व पुढें तीं अक्षरे स्थानभेदानें कंठ, तालव्य इत्यादि शब्दांनी व्यवहारिलीं जातात.

विशुद्धिचक्राचा भेद करून कुंडलिनी वर गेली की, ती आज्ञाचक्रांत प्रवेश करते. आज्ञाचक्र हें दोन भुवयांच्या मध्ये असून याला दोनच पाकळ्या आहेत. या दोन पाकळ्यांत हं आणि क्षं ही दोन बीजे विराजत आहेत. साधकाला याच चक्राच्या आधारे आपल्या उपास्यदेवतेचा, श्रीमहात्रिपुरसुंदरीचा थोडासा साक्षात्कार होत असतो. आ म्हणजे थोडे आणि ज्ञा म्हणजे ज्ञान. अथवा श्रीत्रिपुरसुंदरी ही फारच थोडा काळ या चक्रांत विद्युलेखेप्रमाणें प्रतीतीला येते म्हणूनही या चक्राला आज्ञाचक्र असें म्हटलें जाते. मन हे या चक्राचें तत्त्व होय. या ठिकाणी मन या शब्दाने पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांचाही अंतर्भाव विवक्षित आहेच. त्याचप्रमाणें पंचमहाभूतांनी पंचतन्मात्राही घेतल्या जातात. षट्चक्रांचे भेदन करतांना या एकवीस तत्त्वांचाही भेद होतोच. अर्थात् ही एकवीस तत्त्वें साधकाच्या अधीन होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची साधकाला शक्ति प्राप्त होत असते. पुढें श्रीत्रिपुरसुंदरी सहस्रदल कमलांत प्रवेश करते तेव्हां ती माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव या तत्त्वांशी संपृक्त होते. मायाविशिष्ट महेश्वर हा जीवभावाला प्राप्त होत असतो, तर शुद्धविद्याविशिष्ट सदाशिव हा परमशिवपदाला प्राप्त होत असतो. या परमशिवपदालाच शास्त्रांत सादाख्यकला असें म्हटले आहे. याच सहस्रदल कमलांत विलसत असलेल्या चंद्रमंडलांत आपली उपास्यदेवता श्रीमहात्रिपुरसुंदरी ही परमशिवतत्त्वाशीं समरस होऊन विहार करीत असते. अर्थात् एकरूप होऊन रहाते. तें शिवशक्तींचें ऐक्य एकमेव, अद्वितीय, परिपूर्ण, परब्रह्मस्वरूपच आहे.

आपल्या देहांत असलेल्या मुलाधारादि चक्रांपेक्षां मूर्धस्थानी असलेलें सहस्रदल कमल हें अत्यंत श्रेष्ठ होय. म्हणूनच या कमलाला चक्रराज असें म्हटलें जातें. हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचें निकेतन म्हणजे निवासस्थान असल्यामुळें याही अभिप्रायाने श्रीत्रिपुरसुंदरीला "चक्रराजनिकेतना" असें म्हटलेले आहे. परस्पर तादात्म्यभावाला प्राप्त झालेलें शिवतत्त्व आणि शक्तितत्त्व ही परस्परांच्या तपश्चर्येचीं जणुं मूर्तिमंत फळेंच होत. असे है सदासर्वकाळ पुरातनच असलेले विश्वप्रपंचाचे माता आणि पिता यांना आमचा नमस्कार असो. आम्ही भक्तिभावाने त्यांची स्तुति करीत आहोंत "परस्परतपःसंपत्फलायितपरस्परौ । प्रपञ्चमातापितरौ प्राञ्चौ जायापती स्तुमः" असें एका भक्ताने या शिवशक्तीचे वर्णन केलेले आहे तें अत्यंत योग्य आहे.

या श्लोकांतील "कुलपथ" या शब्दाचा अर्थ कांहीं विद्वान सुषुम्णामार्ग असा करतात, तर कांहीं विद्वान् षट्चक्रें असाही करतात. तात्पर्य, देहामध्यें कुंडलिनीच्या रूपानें विराजमान असलेली श्रीत्रिपुरसुंदरी ही सुषुम्णामार्गाने षट्चक्रांचा भेद करून साधकाच्या उपासनाबलानें ज्या वेळेला सहस्रदल कमलांत प्रवेश करते आणि तेथें असलेल्या चंद्रमंडलांत सच्चिदानंदरूप परमशिवतत्त्वाशीं समरस होते त्या वेळेला तिचा तो आपल्या परमप्रिय शिवतत्त्वस्वरूप पतीबरोबर "रहसि" म्हणजे एकान्तांत होणारा सामरस्य विहार ही तिची नित्यनिरतिशय आनंदरूप अवस्था होय. ही अवस्था लक्षांत घेऊनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें नांव दिलेले आहे. या अवस्थेंत जे भक्त तिचे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आसनें, प्राणायाम, धारणा आणि ध्यान या क्रियांनी शरीरातील वर सांगितलेल्या षट्चक्रांचा भेद करतां येतो. योगमार्गांतील मुलबंध, ओड्याणबंध आणि जालंधरबंध, त्याचप्रमाणे कांहीं मुद्रा यांचाही षट्चक्रभेदनाला उपयोग होतो. मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या इष्ट देवतेच्या उपासनेनेंही षट्चक्रांचा भेद घडवून आणता येतो. त्या त्या चक्रांतील बीजे, अधिष्ठात्री देवता आणि पृथ्वी, जल इत्यादि भूततत्त्वें यांचें चिंतन करीत श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची त्या त्या चक्रांत जर उपासना केली तर कुंडलीस्वरूप असलेली भक्तकामकल्पद्रुम श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वयंजागृत होऊन साधकाच्या षट्चक्रांचे भेदन करीत करीत सकलतत्त्वातीत असलेल्या सहस्रदलकमलांतील निष्कलंक आणि सर्व कलांनी पूर्ण अशा चंद्रमंडलात जेव्हां परमशिवतत्त्वाशीं विहार करते तेव्हां उपासनाबलानें तिच्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेलें साधकांचे मनही त्या अद्वितीय आनंदाचा अनुभव घेत असते. असा हा अर्धनरनटेश्वरी असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या उपासनेचा प्रभाव आहे.

मुलाधारचक्रात पृथ्वीतत्त्वाचा भेद झाल्यानंतर साधकाचे शरीर पृथ्वीचा आधार घेतल्यावांचूनही इतस्ततः संचार करूं शकते. वह्नितत्त्वाचा भेद केल्यानंतर त्याला अग्नि शीतल होतो. जलतत्त्वाचा भेद केल्यानंतर पाणी त्याला बुडवू शकत नाही. अनाहतचक्रांत वायुतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक वायुगतीनें संचार करूं शकतो. श्रीसदाशिवेंद्रसरस्वती, श्रीवासुदेवानंदसरस्वती इत्यादि सिद्ध सत्पुरुषांच्या चरित्रांत ह्या गोष्टी पहावयास सांपडतात. आकाशतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक आकाशगामी होतो. मनस्तत्त्वाचा भेद केल्यानंतर तो मनोगतीने त्रैलोक्यामध्ये संचार करतो. सहस्रदल कमलांतील विहार हा अनिर्वचनीय आनंदस्वरूप असल्यामुळें सर्व सिद्धींची तेथें परिसमाप्ति होते. "सा काष्ठा सा परागतिः" आई ! तुझ्या कृपेने ही अवस्था ज्यांना लाभली खरोखर ते मोठे धन्य होत असें 'रहस्यसिद्धिसोपान' या ग्रंथांत मोठे सुंदर वर्णन केलेले आहे.
 



वरील यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून दहा दिवस त्याची रोज विधिपूर्वक पूजा करावी. आटीव दुधाचा अथवा पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां श्लोकाचा जप करावा. देशांतरीं गेलेला माणूस लौकर परत येईल. याच यंत्राला केशर, कस्तूरी, चंदन इत्यादि सुगंधी द्रव्यांनी लेप करून ४५ दिवस वरच्याप्रमाणे आराधना केल्यास साधकाला पंचमहाभूतांवर विजय संपादन करतां येईल.

Saturday, 22 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ८ वा

सुधासिन्धोर्मध्ये सुरविटपि-वाटी-परिवृते
मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे ।
शिवाकारे मञ्चे परमशिव-पर्यङ्‍क-निलयां
भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम् ॥ ८ ॥ 


"हे मातः धन्याः कतिचन चिदानन्दलहरीं त्वां भजन्ति" हे जगज्जननी माते ! धन्य म्हणजे भाग्यवान पुण्यवान असलेले असे फारच थोडे लोक अखंड चिदानन्द-प्रवाहस्वरूप असलेल्या तुझी उपासना करीत असतात. अर्थात चिदानन्द-स्वरूप असलेल्या तुझी उपासना करणारे फारच थोडे भाग्यवंत लोक असतात. असा या श्लोकातील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत ध्यान करण्याला उपयुक्त असें महात्रिपुरसुंदरीच्या सगुण स्वरूपाचे वर्णन केलें. आतां या श्लोकांत तिच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत आहेत. .सुधासिंधु म्हणजे अमृताचा महासागर, क्षीरसागर असा अर्थ समजावा. या क्षीरसागरांत एक पुष्पराग, पद्यराग, गोमेद, वज्र, वैडूर्य, नील, मौक्तिक, प्रवाळ इत्यादि विविध रत्नांचे सुंदर द्वीप आहे. त्या द्वीपामध्ये जिकडे तिकडे देवांना अत्यंत प्रिय असलेल्या वृक्षांची अर्थात कल्पवृक्ष, संतानवृक्ष, हरिचंदनवृक्ष, मंदारवृक्ष आणि पारिजातवृक्ष या वृक्षांची गर्दी आहे. त्यांची वनेंच्या वनें दृष्टीस पडतात. वाटी म्हणजे उपवनें अथवा बगीचे. त्यांतही आंतल्या बाजूला कदंबवृक्षांचें सुंदर उपवन आहे. त्या कदंबवनांत चिंतामणि रत्‍नांचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरांत परमरमागीय मंगलमय अशा स्वरूपाचे सिंहासन आहे. जणुं कांहीं भगवान् सदाशिव हेच सिंहासन बनलेले आहेत. त्या सिंहासनावर त्यांच्या अंकी अर्थात् वामांकीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली  आहे. शिवतत्त्वाच्याही पलीकडे असलेलें परमशिवतत्त्व हेंच तिचे पर्यंकाप्रमाणें  "निलय" म्हणजे वास्तव्यस्थान आहे. परमशिवतत्त्वामध्येंही ती शक्तिरूपानें अधिष्ठित् झालेली आहे. ती शुद्धचित्स्वरूप आणि आनंदस्वरूप आहे. साधक ध्यान करीत करीत तेथपर्यंत जाऊन पोहोंचला कीं, साधकाच्याही अंतःकरणांत अनिर्वचनीय आनंदाच्या लहरी उसळतात ! चित् म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपाचें ज्ञान, त्याच्या प्रकाशाने प्राप्त होणारा जो अद्वितीय अनिर्वचनीय आनंद अर्थात नित्य निरतिशय सुख अथवा आत्यंतिक समाधान. त्याचे तरंग साधकाच्या अंतःकरणांत उसळत असतात. त्याच्या आत्यंतिक आनंदाला सारखे भरते येत असतें ! आई ! केवढा तुझ्या स्वरूपसाक्षात्काराचा हा महिमा आहे ! तो फारच थोड्यांच्या वाट्याला येतो. तो ज्यांच्या वाट्याला येतो ते खरोखर धन्य होत. यद्यपि चिदानंद हा निर्विकार असल्यामुळें त्याला उसळी येणे किंवा भरते येणे हे संभवत नाहीं, तथापि या ठिकाणीं त्या आनंदाची परिपूर्ण अवस्थाच या ठिकाणी लहरी, उचंबळणे अथवा भरते येणें या शब्दांनी विवक्षित आहे. या ठिकाणचा हा आनंदलहरी शब्दच या स्तोत्राच्या पूर्वार्धाचा वाचक असल्याचें कांहीं विद्वान् मानतात.

कांहीं लोक या श्लोकाचा अर्थ श्रीचक्राला अनुलक्षूनही लावतात. श्रीचक्रामध्ये नऊ आवरणे असतात. आवरण शब्दाचाही अर्थ मंडल किंवा चक्र असाच करतात. श्रीचक्रामध्यें खालची चार चक्रें शिवाची व वरची पांच चक्रें शक्तीच्यी मानली जातात. शिवचक्रें आणि शक्तिचक्रें यांच्यामध्ये असलेल्या अवकाशाला सुधासिंधु असे म्हटलेले आहे. भूपुर, त्रिवलय, षोडशदल कमल आणि अष्टदल कमल हा परिसर ओलांडून आपण पुढें गेलों कीं, शक्तिचक्रांना आरंभ होतो. या शक्तिचक्रांच्या सभोंवारच परिसर हाच सुधासिंधु होय. या सुधासिंधूमध्यें चौदा त्रिकोणांचें एक चक्र दहा-दहा त्रिकोणांची दोन चक्रें आणि आठ त्रिकोणांचें एक चक्र, या सर्वच चक्रांतील बेचाळीस त्रिकोण ह्या जणुं कांहीं मंदार, पारिजात कल्पवृक्ष इत्यादि देववृक्षांच्या वाटिका म्हणजे बागाच आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या अंशभूत असलेल्या या त्रिकोणांतील देवता कल्पद्रुमाप्रमाणे भक्तजनांचे सकल मनोरथ पूर्ण करीत असतात म्हणून या त्रिकोणांना कल्पद्रुम असे म्हटलेले आहे या बेचाळीस त्रिकोणांनी मध्यवर्ति असलेला त्रिकोण हा सर्व बाजूंनी वेष्टिलेला आहे. या मुख्य त्रिकोणाला चिंतामणि-मंदिर म्हटलेले असून त्याच्या बाहेरच्या बेचाळीस त्रिकोण असलेल्या चक्रांना मणिद्वीप कल्पिलेलें आहे. या त्रिकोणांच्या घटक असलेल्या रेखा हे जणु कांहीं त्या मणिद्वीपांतील कदंबवृक्षच होत. कदंबवृक्ष हे श्रीमहात्रिपुरसुंदरीचे अत्यंत आवडते वृक्ष आहेत. म्हणूनच आचार्यानी तिला कदंबवनवासिनी, कदंबवनचारिणी, कदंबवनमध्यगा अशीं विशेषणे दिलेली आहेत.  "कदम्बकाननावासा कदम्बकुसुमप्रिया" असें त्रिशतीमध्यें तिचे वर्णन केलेले आहे. "कदम्बमञ्जरिकॢप्तकर्णापूरमनोहरा" कदंबाच्या मंजरी कर्णभूषण म्हणून तिने आपल्या कानांवर धारण केलेल्या असल्यामुळें ती मोठी मनोहर दिसत आहे असें ललितासहस्रनामांत तिचे वर्णन केलेले आहे. कदंब हा एक कल्पवृक्षांतलाच प्रकार आहे.

श्रीचक्रांतील मध्यवर्ति मुख्य त्रिकोणालाच या श्लोकांत चिंतामणिगृह असें म्हटले असून त्यांतील बिंदु हाच शिवाकार म्हणजे परमरमणीय मंगलमय  मंच म्हणजे पर्यंक अर्थात् पलंग अथवा सिंहासन होय. त्या ठिकाणीं विराजत असलेलें प्रकाशस्वरूप परमशिवतत्त्व म्हणजेच भगवाच सदाशिव, त्यांच्या अर्धांगीं विराजमान असलेली विमर्शस्वरूप महाशक्ति श्रीत्रिपुरसुंदरी हिलाच या श्लोकामध्ये चिदानंदंलहरी असें म्हटलेले आहे. आचार्य म्हणतात, आई त्रिपुरसुंदरी ! श्रीचक्रामध्यें तुझ्या या मंगलमय स्वरूपाचे फारच थोडे लोक चिंतन करतात. जे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आपला देह हाच शिवशक्तीचे अधिष्ठान असल्यामुळें कांहीं लोक सुधासिंधु शब्दाचा अर्थ देह असाच करतात. पाय किंवा मुलाधारचक्र ही शरीराची उत्तम रीतीने धारणा करीत असतात म्हणून त्यांना "सुध" असें म्हणतात. सुध + आसिन्धु =  सुधासिन्धु. आसिन्धु म्हणजे मस्तकामध्ये विराजमान असलेल्या सहस्रदल कमलांतील चंद्रमंडल "आसमन्तात् सेधति सिञ्चति नाडीमार्गं इति आसिन्धु" अशी आसिंधु या शब्दाची व्युत्पत्ति आहे. मस्तकस्थानीं विराजत असलेल्या चंद्रमंडलांतूनच अमृताचा स्त्राव होत असतो व त्याच्या योगानें देहांतील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांच्या द्वारां संपूर्ण देहाचें पोषण होत असतें, म्हणून त्या चंद्रमंडलाला आसिंधु म्हणणें योग्यच आहे. तात्पर्य, सुधासिंधु म्हणजे आपला नखशिखांत देह. या देहामध्ये मुलाधारचक्र स्वाधिष्ठानचक्र इत्यादि चक्रस्थाने रत्नाप्रमाणे विलसत असल्यामुळें तीं चक्रेच  "मणीद्वीप" या शब्दाचा अर्थ समजावा. मणि म्हणजे रत्न आणि द्वीप म्हणजे देवतांचें विशिष्ट आश्रयस्थान. मुलाधारादि चक्रे ही गणेशादि देवतांची अधिष्ठानें आहेत हे प्रसिद्धच आहे. ही सर्व द्वीपें जीवचैतन्यानें व्यापलेली आहेत. म्हणूनच तीं कार्यप्रवण आहेत. याच अभिप्रायाने त्या मणिद्वीपांना "सुरविटपि वाटीपरिवृते" असें विशेषण दिलेले आहे.

"सुष्ठु राजते प्रकाशते इति सुरः" या व्युत्पत्तीप्रमाणे या देहांत विराज-मान असलेलें आत्मचैतन्यच सुर शब्दाचा अर्थ समजावा. या आत्मचैतन्यानें नरवशिखान्त देहाला व्यापलेले असल्यामुळें त्याला "विटपी" म्हणजे विशालवृक्ष असें म्हटले आहे. या वृक्षानें शरीरांतील चक्रस्थाने वेष्टिलेली आहेत. "वाटी" म्हणजे वेष्टन. या देहांत नीपांचीं उपवनें आहेत. नीप शब्दाचा प्रसिद्ध अर्थ कदंब असा आहे. शरीरदृष्टीनें त्रिपुरसुंदरीच्या वसतिस्थानाची कल्पना करीत असतांना नीप शब्दाचा अर्थ पांच मुख्य प्राण आणि पांच उपप्राण असा करतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान यांना मुख्य प्राण असें म्हणतात तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय या पांच वायूंना उपप्राण असें म्हणतात. हे सर्व वायु शरीराचा निर्वाह करीत असतात. शरीराला वागवितात व जगवितात म्हणून यांना "नीप" म्हटले आहे. " नयन्ति पान्ति च इति नीपाः" अशी नीप शब्दाची व्युत्पत्ति आहे. तात्पर्य, शरीरातील दशविध वायु अथवा इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता हेच या मणिद्वीपांतील कदंबवृक्ष होत. या कदंबसमूहांत असलेलें हृत्पुंडरीक अर्थात अनाहत चक्ररूपी हृदयकमल हेंच आपल्या इष्ट देवतेचें "चिन्तामणिगृह" होय. हृदय हें संकल्प-विकल्पात्मक मनाचें वसतिस्थान व आत्म्याचें अधिष्ठान असल्यामुळे आणि तो देहांतील सर्वश्रेष्ठ अवयव असल्यामुळें त्याला चिंतामणिगृह असें म्हणणें योग्यच आहे. तात्पर्य, अशा या हृत्कमलांत मंगलमय सिंहासनावर सदाशिवाशी अभिन्न रूपाने विराजमान असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीचे जें ध्यान करतात ते खरोखर धन्य होत.

कांहीं विद्वान् लोक सुधासिंधु शब्दाचा अर्थ ऋषिमुनींना अभिप्रेत असलेला संपूर्ण अखंड भारतवर्ष असाच करतात. सुधा म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा खडीचा पांढरा शुप्र चुना. त्या चुन्याप्रमाणेच सदासर्वकाळ हिमालय पर्वत बर्फाने आच्छादित असल्यामुळें शुभ्र दिसत असतो, म्हणून सुधा शब्दाने हिमालय पर्वत घेतात. त्या हिमालयापासून "आसिन्धु" म्हणजे सेतु अथवा कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग अर्थात् मानससरोवर आणि कैलास पर्वत यांच्यासह कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग अखंड भारतांत समाविष्ट होतो. त्याचप्रमाणें भारताची पूर्व आणि पश्चिम मर्यादा ही हिमालयानें दाखविलेलीच आहे. "पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्याः इव मानदण्डः" असें कविकुलगुरू श्रीकालिदासानें त्याचें वर्णन केलेलेच आहे. असा हा अखंड भारत हाच प्रकृतस्थलीं सुधासिंधु शब्दाचा अर्थ आहे. अयोध्या मथुरा, हरिद्वार काशी, कांची त्याचप्रमाणे बदरीनाथ, केदारनाथ इत्यादि क्षेत्रें  - त्याचप्रमाणे गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधु, कृष्णा, तुंगभद्रा इत्यादि तीर्थें त्याचप्रमागणें ज्योतिर्लिंगें हीच या भारतरूपी सुधासिंधूतील मणिमयद्वीपें समजावींत. यांत कदंबांची उपवनें तर आहेतच. त्या त्या तीर्थक्षेत्रांतील देवता ह्या कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या असल्यामुळें त्याच या सुधासिंधूतील कल्पवृक्ष होत. अशा या अखंड भारतरूपी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या मंदिरांत चिंतामणीप्रमाणें मनोहर मंदिरे आहेत. अशा या भारतवर्षरूपी सुधासिंधूमध्यें विराजत असलेला कैलास पर्वत हाच "शिवाकार मंच" होय. कैलास पर्वताच्या भोंवताली असलेल्या पायथ्याच्या पर्वतांच्या रांगा या श्रीयंत्रांतील पहिल्या मुख्य त्रिकोणाप्रमाणेच दिसतात. जणुं कांहीं ती शंकरांची शाळुंकाच आहे. प्रत्यक्ष कैलास पर्वत हा त्या शाळुंकेंतील महादेवाच्या पिंडीप्रमाणे दिसतो. अथवा श्रीचक्रांतील मुख्य त्रिकोणांत असलेला मध्यवर्ती बिंदु जसा असावा तसाच तो कैलास पर्वत मानससरोवराच्या जवळ शोभत आहे. त्रैलोक्याचे गुरु भगवान् सदाशिव तेथेंच विराजमान झालेले आहेत. त्यांच्या वामभागीं अंकरूपी पर्यंकावर देवी श्रीमहात्रिपुरसुंदरी विराजत आहे. म्हणूनच तिला "परमशिवपर्यंकनिलया" असें म्हटलेले आहे. तात्पर्य, अखंड भारतरूपी सुधासिंधूमध्ये विलसत असलेल्या कैलासरूपी मंचकावर सदाशिवाच्या वामभागीं तादात्म्याने विराजत असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीचे जे कांहीं थोडे लोक ध्यान करतात ते धन्य होत. यद्यपि श्रीत्रिपुरसुंदरीच्या मंदिराचा परिसर असलेला भारत आज अखंड राहिला नाहीं तरी भक्तजनांच्या ध्यानाला यथार्थता यावी म्हणून सर्वसमर्थ असलेली श्रीमहात्रिपुरसुंदरी या भारताला पुन्हा अखंड करील. जगाला उपद्रव देणाऱ्या शुंभ, निशुंभ, चंड, मुंड अथवा महिषासुर इत्यादि दैत्यांचा जसा तिनें नाश केला तसाच ती भारताला खंडित करणाऱ्या दुष्टांचाही नाश करील. "इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति तदा तदावतीर्याहं करिष्याम्यरिसक्षयम्" असें तिनेंच आश्वासन दिले आहे. मात्र वर वर्णन केल्याप्रमाणें तिची उपासना करणाऱ्या भक्तांची बहुसंख्या आणि अनन्यभक्ति यांची आवश्यकता आहे. कांहीं लोक ॐकारांतील अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा हाच शिवाकार मंचक समजून त्यावर विराजत असलेल्या शिवशक्तिस्वरूपाचे ध्यान करतात.



 




हें यंत्र रक्तचंदनाच्या तुकड्यावर तयार करून रक्तपुष्पांनी त्याची बारा दिवस विधिपूर्वक पूजा करावी. काळ्या मिऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा बाराशे जप करावा.   या प्रमाणें यंत्र सिद्ध करून धारण केल्यास कारागारांतून सुटका होते व सर्व कार्यांमध्यें विजय मिळतो.

Friday, 21 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ७ वा

क्वणत्काञ्चीदामा करिकलभ-कुम्भस्तननता 
परिक्षीणा मध्ये परिणत-शरच्चन्द्र-वदना ।
धनुर्बाणान्पाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुरस्तादास्तां नः पुरपथितुराहोपुरुषिका ॥ ७ ॥


"पुरमथितु आहोपुरुषिका नः पुरस्तात् आस्ताम्" त्रिपुरारि भगवान् सदाशिव यांनी जिच्याबद्दल अहंकार बाळगावा, जिच्यामुळे स्वतःला धन्य मानावे, जिच्या सामर्थ्यावर विश्वाला सुखी करावे, शिव म्हणजे मंगलमय आणि शंकर म्हणजे सुखी करणारा अशी बहुमानाची ख्याति मिळवावी, ती शंकरांची आहोपुरुषिका म्हणजे मूर्तिमंत अहंकार अथवा उत्साहशक्ति श्रीदेवी महात्रिपुरसुंदरी,  "नः" म्हणजे आमच्या "पुरस्तात्" म्हणजे पुढें अर्थात् हृदयमंदिरामध्यें किंवा हृत्कमलामध्ये निरंतर विराजमान असो, असा या श्लोकांतील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील दोन श्लोकांत भगवाच श्रीविष्णू आणि कामदेव यांनी श्रीविद्येची उपासना करूनच महात्रिपुरसुंदरीची कृपा संपादन केली व तिच्या कृपेनेच ते पूर्ण समर्थ बनले असे प्रतिपादन केलें. आपणही तिची उपासना करून कृतार्थ व्हावें या अभिप्रायाने या श्लोकांत श्रीविद्यास्वरूप असलेल्या महाशक्तीचे सगुण स्वरूप आचार्य स्पष्ट करीत आहेत. ध्यानाकरितां सगुण स्वरूपाचीच आवश्यकता असते. इष्टदेवतेच्या सगुण स्वरूपांत चित्ताला स्थिर करून तेथें त्याची एकतानता करणें यालाच ध्यान असें म्हणतात. तें ध्यान सगुण स्वरूपाचेंच होऊं शकते. निर्गुणाचे चिंतन करतां येतें पण ध्यान करतां येत नाहीं. याच अभिप्रायाने "अथ ध्यानं" असें म्हणून आपण जे लोक म्हणत असतो त्या श्लोकांत इष्ट देवतेच्या सगुण स्वरूपाचेंच वर्णन केलेलें असतें असें आपल्या दृष्टीस पडेल.

यावर कोणी असें म्हणेल कीं, अहो ! " ब्रह्मानन्दं परमसुरवदं केवल ज्ञानमूर्तियम्" या सद्‌गुरूच्या ध्यानांत सद्‌गुरूच्या निर्गुण स्वरूपाचेंच वर्णन केलेले आहे. तेव्हां ध्यानाकरितां सगुण स्वरूपच लागतें, हें विधान बरोबर नाहीं. यावर उत्तर असें कीं,  "ब्रह्मानन्दं परमसुखदं" या श्लोकांत शेवटीं "सद्‌गुरु तं नमामि" असें जें वाक्य आहे त्या वाक्यांतील सद्‌गुरु हाच शब्द त्यांच्या सगुण स्वरूपाचा द्योतक आहे. ब्रह्मानन्द इत्यादि शब्दांनी त्यांचा स्वभाव वर्णिलेला आहे. सद्‌गुरु हे आकृतीने मानव असले, तरी स्वभावाने ते परब्रह्म स्वरूप असतात. सद्‌गुरूंच्या स्वभावाचे चिंतन व आकृतीचे ध्यान हेंच त्या श्लोकांत विवक्षित आहे. निर्गुणाचेंही ध्यान करतां येतें असा कोणी आग्रहच धरला तर "क्लेशोऽधिकतरस्तेषां " त्यांना अत्यंत क्ल्श पडतात हें श्रीकृष्णाचे वचन त्यांनी लक्षांत घ्यावे.

असो. प्रकृतस्थलीं श्रीविद्यास्वरूप महात्रिपुरसुंदरीचे भक्तजनांना सहज सुलभ रीतीनें ध्यान करतां यावें म्हणून आचार्य तिच्या सगुण स्वरूपाचें वर्णन करीत आहेत. कशी आपली माता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आहे तें पहा : तिने आपल्या कमरेला रत्नजडित सुवर्णाचा कंबरपट्टा घातलेला आहे. त्या कंबरपट्ट्यांतील साखळ्यांना घुंगरे बसविलेली आहेत. त्या घुंगरांचा कर्णमधुर आवाज होत आहे. जगजननी त्रिपुरांबा श्रीविद्या आपल्यावर अनुग्रह करण्याकरितां चालत येत आहे. आपल्या हृत्कमलांत वास्तव्य करण्याकरितां ती चालत येत आहे. ती चालत आहे म्हणूनच तिच्या कंबरपट्ट्यांतील घुंगरांचा आवाज होत आहे याच अभिप्रायाने "क्वणत्काञ्चीदामा" या पदात क्वणत् या शब्दाचा उपयोग केलेला आहे. जिचा काञ्चीदाम म्हणजे कंबरपट्टा क्वणर् म्हणजे मधुर शब्द करणारा आहे अशी ती माता त्रिपुरसुंदरी. असा पहिल्या विशेषणाचा अर्थ आहे. कंबरपट्टा हें एक उदाहरणमात्र आहे. इतरही सर्व अलंकार यथायोग्य रीतीनें तिने घातलेले आहेत असेंच तिचे ध्यान करावे.

"करि-कलभ-कुम्भ-स्तन-नता" भक्तजनांचें पोषण करण्याकरितां तिने आपल्या स्तनांमध्यें स्तन्य अर्थातू अमृतरूप दुग्ध धारण केलेले असल्यामुळें ती तीस वर्षांच्या हत्तीच्या गंडस्थलाप्रमाणें पुष्ट असलेल्या स्तनभारानें किंचितू नम्र झालेली दिसत आहे. भगवान सदाशिव हे विश्वंभर आहेत तर त्यांची अर्धांगी जगज्जननी श्रीविद्या ही तत्स्वरूपच असल्यामुळें ती विश्वंभरा आहे. विश्वाच्या भरण-पोषणाला अनुरूप असा स्तनभार धारण करणें हें तिच्या अंगीं असलेल्या अनन्यसाधारण वात्सल्याचें द्योतक आहे. अनन्यभावानें आपण तिची आराधना केल्यास भक्तवत्सला जगज्जननी आपली उपेक्षा करणार नाही हें निश्चित समजावे असा भाव या विशेषणांत आहे.

"मध्ये परिक्षीणा" भक्तजनांनीं ध्यान करण्याकरितां तिने धारण केलेला देह हा मध्यभागी म्हणजे कमरेजवळ परिक्षीण म्हणजे कृश झालेला दिसत आहे. कमरेजवळ उदराची दिसणारी कृशता ही विकृति नसून तें देहरूपी उपाधीचे प्राकृतिक सौंदर्य आहे. जगज्जननीचे मुखकमल हें शरदृतूंतील पूर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी आणि आल्हाददायक आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत अंकुश आणि पाश ही दोन आयुधें आहेत. उजव्या हातांत अंकुश असून डाव्या हातांत पाश म्हणजे दोरी आहे. ही दोन्ही आयुधे सुवर्णाची आहेत. खालच्या उजव्या हातांत पुष्पांचे बाण असून डाव्या हातांत उंसाचे धनुष्य तिने धारण केले आहे. कपाळी केशराचा मळवट असून तिने केसांच्या भांगापर्यंत उभा कस्तूरीचा टिळा धारण केलेला आहे. नेत्र प्रफुल्लित आहेत. मुखावर मंद हास्य झळकत आहे. अरुण वर्णाचे वस्त्र परिधान केले असून, अरुण वर्ण असलेल्या फुलांची माळ तिच्या गळ्यांत शोभत आहे. तिची अंगकांतीही जास्वंदीच्या फुलाप्रमाणे देदीप्यमान आहे. असेंच जपाच्या वेळीं तिचे ध्यान करावे. याप्रमाणें आचार्यांनी तिचे दुसरीकडेही वर्णन केलेले आहे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही स्वतः निर्गुण, निराकार, निर्विकार, शुद्ध, चिन्मय, आनंदमय असूनही केवळ भक्तजनांच्या कल्याणासाठी तिने हें सगुण साकार रूप धारण केले आहे. साधकाने तिच्या याच स्वरूपाचे चिंतन करावे. ध्यान करावे. या श्लोकांतील  "आहोपुरुषिका" या शब्दाचा अर्थ अहंकार, स्वाभिमान असा आहे. गर्व त्याज्य असला तरी स्वत्वाभिमान हा आदरणीयच असतो. ही गोष्ट सर्वमान्य आहे  तात्पर्य, अशी ही श्रीदेवी ललितामहात्रिपुरसुंदरी आमच्यापुढे नित्य विराजमान असो.

 




या श्लोकाचें यंत्र त्रिशूलरहित केवळ सोन्याच्या पत्र्यावर समभुज चतुष्कोण काढून मध्यभागी क्लीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूर्वेकडे तोंड करून विधियुक्त पूजा करावी. रोज या लोकाच्या एक हजार जप करावा. पायसाचा नैवेद्य दाखवावा. सिद्ध केलेले हें यंत्र शत्रूवर विजय मिळविण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

Thursday, 20 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ६ वा

धनुः पोष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्च विशिखाः 
वसन्तः सामन्तो मलय-मरुदायोधन-रथः ।
तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा-
मपाङ्‌गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्‌गो विजयते ॥ ६ ॥


"हे हिमगिरिसुते ! अनङ्‌गः ते अपाङ्‌गात् कां अपि कृपां लब्ध्वा इदं सर्वं जगत् एकः विजयते" हे हैमवती गिरिजे माते ! हा अनंग म्हणजे शरीर नसलेला मदन अर्थात् कामदेव तुझ्या कृपापूर्ण कटाक्षांतून अनिर्वचनीय असा कृपेचा लेश संपादन करून त्याच्या जिवावर हें सर्व जग तो एकटाच जिंकतो. असा या श्लोकातील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागच्या श्लोकांत अनंग म्हणजे कामदेव हा श्रीविद्येच्या उपासनेनें समर्थ झाला असें सांगितले. त्याचेंच अधिक स्पष्टीकरण या श्लोकांत करीत आहेत. कामदेव हा स्वतः अनंग म्हणजे शरीररहित आहे. तरी तो सर्व जगाला जिंकीत असतो. बरें त्याची युद्धाची सामग्री तरी काय आहे ? त्याचे धनुष्य पहावें तर तें "पौष्पं" म्हणजे फुलांचें तयार केले असतें. म्हणूनच मदनाला संस्कृत भाषेमध्ये पुष्पधन्वा असें नांव आहे. मौर्वी म्हणजे धनुष्याची दोरी. ती पहावी तर "मधुकरमयी" अर्थात भ्रमरांची माळा. भ्रमरांचा समुह ! तो काय धनुष्याच्या दोरीचे काम करणार ? आणि फुलांचें धनुष्य तरी काय उपयोगाला येणार ? "विशिख" म्हणजे बाण. ते पहावेत तर ते संख्येने पांचच आहेत. हे पांच बाण हातचे निघून गेले कीं, पुढें तो काय युद्ध करणार ? बरें मदनाला साहाय्य करणारा पहावा तर तो वसंत. वर्षांतून दोन महिने त्याचें अस्तित्व ! तो बिचारा किती साहाय्य करणार ? बरें याचा युद्ध करण्याचा रथ तरी कोणता आहे ? असें विचाराल तर सांगतात, "मलयमरुत्" म्हणजे दक्षिणेकडील मलय पर्वतावरचा वारा ! त्याला ना रूप ना आकार ! असा हा कामदेवाच्या युद्धाच्या सामग्रीचा थाट आहे ! तरी देखील तो एकटा या सर्व जगाला जिंकीत असतोच. हा कशाचा प्रभाव आहे ? हे नगाधिराजतनये माते पार्वती ! हा तुझ्या कृपाकटाक्षाचा प्रभाव आहे ! तात्पर्य, आई जगदंबे ! तुझी कृपा मुक्यालाही वाचस्पति बनवते ! पंगुलाही मेरु पर्वताचे उल्लंघन करायला लावते ! राईचा पर्वत बनविते तर पर्वताचाही खंदक करते ! योग्य कारण नसतांनाही कार्याची निष्पति दाखविल्यामुळे या श्लोकांत विभावना अलंकार साधला आहे.

शंकरांनी कामदेवाला जाळून टाकले, पण पार्वतीने आपल्या कृपापूर्ण अमृतमय दृष्टीनें त्याला पुन्हा जन्म दिला ! अक्षि म्हणजे डोळा. पार्वतीच्या अक्षीपासून कामदेवाला पुन्हा जन्म मिळाल्यामुळे तिला कामाक्षी असें नांव पडलें. कांची नगरीची ती अधिष्ठात्री देवता आहे. "कामोऽक्षितो यतो जातस्तस्याः कामेश योषितः । कामाक्षीति ततः ख्यातिं सा गता काञ्चिचकापुरे" कामेश्वरयोषित् याचा अर्थ भगवान् सदाशिव यांची पत्नी जगन्माता महात्रिपुर सुंदरी असा आहे. तात्पर्य, आई जगज्जननी ! तुझा हा अद्‌मुत प्रभाव पाहूनच मी तुझ्या चरणीं शरण आलों आहे. कृपा करून तूं मलाही कृतार्थ कर.
 





श्लोक क्रमांक ५ प्रमाणेंच याही श्लोकाचें यंत्र केवळ त्रिशूलयुक्त समभुज चतुष्कोण तयार करून मध्यभागीं क्लीं क्लीं क्लीं या बीजांच्या एकाखाली एक अशा दोन ओळी लिहाव्यात. त्या दोन ओळींमध्ये थोडे अंतर ठेवून त्या जागी साध्याचा उल्लेख करावा. सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पूर्वेकडे तोंड करून यथाशास्त्र एकवीस दिवस अनुष्ठान करावे. उंसाचे सोलीव तुकडे करून त्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज पांचशे वेळां श्लोकाचा जप करावा. फल = षांढ्यनिवृत्ति आणि पुत्रप्राप्ति.

Wednesday, 19 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ५ वा

हरिस्त्वामाराध्य प्रणत-जन-सौभाग्यजननीं
पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत् ।
स्मरोऽपि त्वां नत्वा रति-नयन-लेह्येन वपुषा
मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम् ॥ ५ ॥


"हे मातः हरिः प्रणतजनसौभाग्यजननीं त्वां आराध्य पुरा नारी भूत्वा पुररिपुं अपि क्षोभं अनयत् । स्मरः अपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा महतां मुनीनां अपि अन्तः मोहाय प्रभवति हि ।" हे माते जगदंबे ! भगवान श्रीविष्णू यांनी तुझीच आराधना करून सामर्थ्य संपादन केले आहे. कारण तूं चरणीं नम्र झालेल्या भक्तजनांना सर्व प्रकारचे उत्तम भाग्य प्राप्त करून देणारी आहेस. भगवान श्रीविष्णू तुझ्या कृपेनेच परम विरक्त असलेल्या शंकरांच्याही अंतःकरणांत मोह निर्माण करण्यास समर्थ झाले आहेत. पूर्वी देवांना अमृताची प्राप्ति करून देण्यासाठी समुद्राचे मंथन करण्यांत आलें. त्या वेळीं हातांत अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी समुद्रांतून बाहेर आले. पहाता पहाता दैत्यांनी त्यांच्या हातून अमृताचा कलश पळविला. देव हताश झाले. इकडे दैत्यामध्ये अहमहमिका सुरू झाली. हा म्हणतो मी अगोदर घेईन. तूं कोण ? तो म्हणतो मी अगोदर घेईन. तूं कोण ? इतक्यांत भगवान विष्णू मोहिनीचे रूप घेऊन तेथें आले. मोहिनीला पहातांच सर्व दैत्यांना मोह निर्माण झाला. ते तिच्या पाठीमागे लागले ! ते तिच्या अंकित बनले ! त्यांनीं तो अमृतकलश तिच्या स्वाधीन केला ! तिने मोठ्या युक्तिप्रयुक्तीने तें अमृत देवांना वांटून टाकले ! देव संतुष्ट झाले. देवांच्या संतोषानें त्रैलोक्यही संतोषले. पुढें शंकरांना तें रूप पहावेसें वाटलें. पार्वतीसह ते विष्णूकडे गेले. तें रूप दाखविण्याची श्रीविष्णूला त्यांनीं विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन विष्णूने पुन्हा मोहिनीचे रूप घेतलें. भगवान् शंकर स्वतः कामारि, मदनाला भस्म करून टाकणारे. पण तें रूप पाहून त्यांच्याही चित्ताचा क्षोभ झाला ! जवळ असलेल्या पार्वतीला सोडले आणि ते मोहिनीच्या पाठीमागे लागले ! ! हा इतिहास लक्षांत घेऊनच आचार्यांनी "पुरा नारी भूत्वा" इत्यादि वर्णन केलेले आहे. तात्पर्य, विष्णूच्या अंगीं त्रैलोक्यरक्षणाचें व विविध रूपें धारण करण्याचें जें सामर्थ्य आहे तें महात्रिपुरसुंदरीच्याच आराधनेचें फळ आहे.

स्मर म्हणजे कामदेव. केवळ स्मरणानेंही लोकांच्या चित्ताला अस्वस्थ करून टाकतो म्हणून त्याला "स्मर" असें म्हणतात. याला शंकरांनी जाळून टाकले होतें. पण आदिभवानीच्या जगदंबेच्या कृपेने त्याला जीवदान मिळाले. पुढें त्यानें महात्रिपुरसुंदरीची आराधना केली. त्या आराधनेच्या प्रभावानेंच पुढें तो त्रैलोक्यविजयी बनला. रति कामदेवाची स्त्री, ती अतिशय सुंदर, पण तिनेंही आपल्या सौंदर्याचा अभिमान बाजूला ठेवून अहोरात्र आपल्या डोळ्यांची ओंजळ करावी व मदनाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. इतकें सुंदर रूप महात्रिपुरसुंदरीच्याच कृपेने कामदेवाला मिळाले. मोठ्या मोठ्या ऋषिजनांच्याही अंतरंगांत मोह निर्माण करण्याला तो समर्थ झाला. आचार्य म्हणतात आई ! हा तुझ्याच कृपेचा प्रभाव आहे.

कोणी म्हणेल विष्णूने आणि कामदेवानें श्रीमहात्रिपुरसुंदरीची आराधना केली याला काय प्रमाण ? यावर उत्तर असें कीं, वामकेश्वर महातंत्रांतच हा इतिहास वर्णिलेला आहे. पहा -

"एतामेव पुराऽऽराध्य विद्यां त्रैलोक्यमोहिनीम् ।
त्रैलोक्यं मोहयामास कामारिं भगवान् हरिः ॥
कामदेवोऽपि देवेशीं देवीं त्रिपुरसुन्दरीम् ।
समाराध्याभवल्लोके सर्व सौभाग्यसुन्दरः ॥"

श्रीविद्येच्या मंत्राचे विविध प्रकार आहेत. त्यांपैकीं एका मंत्राचे ऋषि अर्थात द्रष्टे प्रत्यक्ष श्रीविष्णूच आहेत. त्याचप्रमाणे कामदेव देखील एका मंत्राचे द्रष्टे असल्याबद्दलचा उल्लेख दृष्टीस पडतो. असा हा श्रीविद्यास्वरूप महात्रिपुरसुंदरीचा प्रभाव लक्षांत घेऊनच आचार्य म्हणतात, आई ! मी तुझ्या चरणी शरण आलों आहे. कृपा कर.
 



हें यंत्र तांब्याच्या पत्र्यावर काढून त्याची विधिपूर्वक वायव्य दिशेला तोंड करून आठ दिवस पूजा करावी. गूळ आणि पायस यांचा नैवेद्य दाखवावा. रोज दोन हजार वेळां या श्लोकाचा जप करावा हें यंत्र सकलजन संमोहन करणारे आहे. पति आणि पत्नी यांच्यांतील वैमनस्य दूर होईल. हें यंत्र गळ्यांत अथवा वेणींत घालावे.

Tuesday, 18 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ४ था

त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः
त्वमेका नैवासि प्रकटितवरभीत्यभिनया ।
भयात्त्रातुं दातुं फलमपि च वाञ्छासमधिकं
शरण्ये लोकानां तव ही चरणावेव निपुणौ ॥ ४ ॥

'हे मातः जगज्जननि ! त्वदन्यः दैवतगणः पाणिभ्यां अभयवरदः अस्ति । एका त्वं प्रकटितवरभीत्यत्यभिनया नैव असि । हे लोकानां शरण्ये ! ही भयात् त्रातुं अपि च वाच्छासमधिकं फलं दातुं तव चरणौ एव निपुणौ स्तः ।" हे आई जगज्जननी ! तूं म्हणशील कीं, इतर पुष्कळ दैवतें भक्तजनांना अभय आणि इष्ट वर देण्याकरितां तत्पर आहेत. हें त्यांनीं धारण केलेल्या अभयमुद्रेवरून आणि वरमुद्रेवरून स्पष्टच दिसत आहे. मग त्यांनाच का नाहीं शरण जात ? यावर माझें उत्तर असें आहे कीं, तुझ्याहून निराळा असलेला देवतांचा समुदाय केवळ हातानेच आपण अभय आणि इष्ट वर देणारे आहोंत असें सुचविणारा आहे. हा केवळ त्यांचा अभिनय म्हणजे नाटकांतल्या सोंगासारखी कृति आहे. तत्त्वतः त्यांच्यामध्यें ते सामर्थ्य नाहीं असें आचार्यांनी "अभिनय" या शब्दाचा प्रयोग करून ध्वन्यर्थानें सूचित केलेले आहे. इतर देवांमध्ये जें कांहीं थोडेंबहुत सामर्थ्य आहे तेही त्यांना श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच कृपेनें प्राप्त झालेले आहे. हें सर्व त्यांच्या इतिहासावरून उघड आहे. "ये ही ब्रह्मादयो देवा भवन्ति वरदायिनः । त्वद्‌रूपां शक्तिमासाद्य ते भवन्ति वरप्रदाः ॥ "

आई ! तूं मात्र एकच एक अशी आहेस कीं, तूं कोणत्याही प्रकारें वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करण्याचें सोंग केले नाहीस, आणि तसें करण्याचें तुला कांहीं कारणही नाहीं. कारण तूं सर्व लोकांनी शरण जाण्याला योग्य आहेस. अथवा सर्व लोकांचे संरक्षण करण्याला तूं योग्य आहेस. भक्तजनांचें भयापासून संरक्षण करण्याला अथवा त्यांना त्यांच्या इच्छेपेक्षांही अधिक फल देण्याला तुझे चरणच निपुण म्हणजे प्रवीण आहेत. निपुण शब्दाचा कुशल अर्थात समर्थ असाही अर्थ होतो. अशा स्थितींत हे आई ! तुला हातांनी वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करण्याचें कांहींच कारण नाही. डाव्या हाताची चार बोटें तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका हीं एकास एक जुळवून उताणा तळहात किंचित् अधोमुख धारण केला म्हणजे वरमुदा बनते. त्याचप्रमाणें उजवा तळहात ऊर्ध्वमुख धारण केला म्हणजे अभयमुद्रा तयार होते. "अधोमुखो वामहस्तः प्रधृतो वरमुदिका ऊर्ध्वीकृतो दक्षहस्तः प्रधृतोऽभयमुद्रिका" अशीं या दोन मुद्रांची लक्षणें आहेत. तात्पर्य, आई महात्रिपुरसुंदरी ! तुझ्या कृपेनें हरिहरादि देवांचेही मनोरथ सफल होतात मग माझे होतील यात काय नवल आहे ! हें तुझें सामर्थ्य लक्षांत घेऊनच मी तुझ्या चरणी शरण आलो. "हि" या अव्ययाचा प्रयोग कारण आणि निश्चय अशा दोन्ही अर्थाने होतो. या श्लोकांत उपमेय हें उपमानापेक्षांही श्रेष्ठ असल्याचें वर्णन केले असल्यामुळें साहित्यशास्त्रदृष्ट्या व्यतिरेकालंकार सिद्ध होतो.
 



हे यंत्र चांदीच्या पत्र्यावर लिहून त्याची पूर्वेकडे तोंड करून यथाशास्त्र पूजा करावी. सोळा दिवस अथवा छत्तीस दिवस या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. नैवेद्य केशरी भात. यानें साम्राज्य-सिद्धि, सर्व रोगांचा नाश व दारिद्र्याचा परिहार होतो. कांहीं लोक 'दुं'च्या ऐवजीं 'श्रीं' हें बीज लिहितात.

Monday, 17 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक ३ रा

आवद्यानामन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी
जडानां चेतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी ।
दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका जन्मजलधौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ॥ ३ ॥


"हे मातः तव चरणकमलपांसुः अविद्यानां अन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी भवति, जडानां चैतन्यस्तबक-मकरन्द-स्त्रुति-झरी भवति, दरिद्राणां चिन्तामणि- गुणनिका भवति, जन्मजलधौ निमग्नानां मुररिपु-वराहस्य दंष्ट्रा भवति, स कथं मां अनुपयुक्तो भविष्यति ?" आचार्य म्हणतात, आई जगल्जननी ! तूं म्हणशील कीं, तूं माझी स्तुति करावयास कसा समर्थ होशील ? तूं अज्ञानी आहेस,  जड आहेस, तुझ्या ठिकाणी विचारसंपत्ति नाहीं, तूं दरिद्री आहेस, संसार-सागरांत बुडालेला आहेस. संसारांत गर्क झालेला आहेस, तुला काय माझी स्तुति करतां येणार ? यावर माझें उत्तर असें आहे कीं, आई ! तुझ्या चरणकमलाच्या रजःकणाचे सामर्थ्य फार मोठे आहे. अर्थात तुझेंही पण. मग मी तुझ्या कृपेने नाहीं कां समर्थ होणार ?

तुझ्या चरणकमलाचा राजःकण म्हणजे "अविद्य" अर्थात् अज्ञानी असलेल्या लोकांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिराचा नाश करणाऱ्या सूर्याची ती उदयस्थानांतील अथवा उदयाचलावरील नगरी आहे. सूर्य उदयाला आला म्हणजे अंधकार जसा मावळतो त्याप्रमाणें आई ! तुझ्या चरणकमलाच्या रजःकणानेंही अज्ञ जनांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी अंधकार मावळतो यांत शंका नाहीं. त्याचप्रमाणें तुझ्या चरणकमलांतील राजःकण म्हणजे जड अर्थात मतिमंद असलेल्या लोकांना चैतन्यरूपी पुष्पगुच्छांतील मकरंदाला अविरत स्रवणारा तो एक झराच आहे. तात्पर्य, जडालाही चैतन्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आई ! तुझ्या चरणकमळाच्या रजःकणांत आहे. तो राजःकण म्हणजे दयनीय दरिद्री लोकांचे सकल मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणिरत्नांचा समूहच आहे. गुणनिका शब्दाचा अर्थ माळा अथवा राशि, समूह असा आहे. एक चिंतामणि जरी हातीं लागला तरी दारिद्र्याचा परिहार होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, तर मग चिंतामणि रत्नांची माळ अथवा राशि हातीं आल्यानंतर दारिद्र्याचा परिहार होईल हे काय सांगावयास पाहिजे ? आई ! तुझ्या चरागकमलाच्या कृपेनें माझ्या सर्व विचारदारिद्र्याचा परिहार होईल यांत शंकाच नाही.

आई जगज्जननी ! तुझ्या चरणकमलाचा राजःकण म्हणजे जन्ममरणरूपी संसारसागरांत पार बुडून गेलेल्या लोकांना त्यांचा उद्धार करणारी ती एक आदि विष्णूस्वरूप असलेल्या वराहाची दाढाच आहे ! पूर्वी ही पृथ्वी समुद्रामध्ये रसातळाला गेली असतां आदिविष्णूंनीं वराहाचा अवतार धारण करून विरोध करणाऱ्या हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या दाढेवर तोलून धरून पृथ्वीचा उद्धार केला ही पुरातन ऐतिहासिक कथा प्रसिद्धच आहे. आई ! माझ्यासारख्या संसारसागरांत बुडालेल्या जनांचा उद्धार करण्याकरितां तुझ्या चरणकमलाचा रजःकण म्हणजे आदि-विष्णुस्वरूप असलेल्या वराहाची ती एक दाढाच आहे. तात्पर्य, संसारसागर कितीही गहन असला तरी तुझ्या चरणकमलाच्या कृपेने उद्धार होण्यास कांहींच अवघड नाहीं ! आई ! हा सर्व विचार करूनच मी तुझी स्तुति करण्यास प्रवृत्त झालो आहें. तात्पर्य, तुझ्या कृपेने माझे सकल मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत.

या श्लोकांत महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील रजःकणाला नगरी, झरी, चिंतामणि-माला आणि वराहदंष्ट्रा अशी कल्पना करूनआचार्यांनी परंपरित रूपकाची जणुं कांहीं मालाच तयार केली आहे ! प्रत्येक ठिकाणी कल्पनेचे रमणीयत्व, गांभीर्य हें कांहीं अपूर्व आहे. कांहीं लोक या ठिकाणी परिणामालंकारही मानतात.
 



हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची ईशान्य दिशेकडे तोंड करून विधिपूर्वक चोपन दिवस पूजा करावी. उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज दोन हजार वेळां श्लोकाचा जप करून यंत्र सिद्ध करावे. याने सर्व ऐश्वर्याचा व विद्येचा लाभ होतो.

Sunday, 16 September 2018

सौन्दर्यलहरी श्लोक २ रा

तनीयांसं पांसुं तव चरणपङ्‌केरूहभवं
विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम् 
वहत्येनं शौरि कथमपि सहस्रेण शिरसां
हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलनविधिम् ॥ २ ॥ 

"हे भगवति ! विरिञ्चिः तव चरणपङ्‌केरूहभवं तनीयांसं पांसुं सञ्चिन्वन् लोकान् अविकलं विरचयति । शौरिः शिरसां सहस्रेण एनं कथमपि वहति । हरः एनं संक्षुद्य भसितोद्‌धूलनविधिं भजति" असा या लोकाचा अन्वय आहे. मागच्या श्लोकामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र त्याचप्रमाणें इंद्र, अग्नि आणि वायु इत्यादि इतरही देव थीललितामहात्रिपुरसुंदरीची आराधना करतात असा उल्लेख केला आहे. तिच्या कृपेनेच ते या विश्वरूपी संस्थेंतील आपआपलें अंगीकृत कार्य सुव्यस्थित रीतीनें पार पाडण्यास समर्थ होतात असा हा चिच्छक्तिस्वरूप असलेल्या जगन्मातेचा महिमा आहे असेही सांगितले. हाच विषय या दुसऱ्या श्लोकांत अधिक स्पष्ट करून सांगत आहेत.

हे जगन्माते महात्रिपुरसुंदरी ! ब्रह्मदेव, विष्णु आणि शंकर हे या सृष्टीच्या रचनेचे, संरक्षणाचे आणि संहाराचे अधिकारी आहेत. अधिकारपरत्वे आपआपलें कार्य ते तुझ्याच चरणकमलाच्या प्रभावानें पार पाडीत असतात. तुझ्या चरणकमलाचा महिमा मी काय वर्णन करूं ? त्याचें साकल्याने वर्णन करणें अशक्य आहे. आई ! ब्रह्मदेवाचे हे अवाढव्य सृष्टिरचनेचें कार्य चाललेले आहे, पण त्याचें भांडवल काय आहे ? असा जर कोणी प्रश्न केला तर तुझ्या चरणकमलांतील परागाचा एक लहानसा रजःकण हेंच त्याचें उत्तर आहे. कमळाप्रमाणें सुकोमल आणि आरक्तवर्ण असलेल्या तुझ्या चरणाचा एक लहानसा रजःकण गोळा करून अथवा हातीं घेऊन ब्रह्मदेव संपूर्ण भूतभौतिक विश्वप्रपंचाची रचना करीत असतो. भूलोक, भुवर्लोक स्वर्लोक इत्यादि वरची सात भुवने आणि अतल, वितल, सुतल इत्यादि खालची सात भुवने याप्रमाणे चतुर्दश भुदनात्मक प्रचंड ब्रह्मांडाच्या रचनेचें ब्रह्मदेवाचे साधन काय, तर तुझ्या चरणकमलांतील एक रजःकण !

प्रलयकाळीं सर्व कार्यप्रपंचाचा नाश होऊन जिकडे तिकडे पृथ्वी, जल तेज आणि वायु या महाभूतांचे परमाणूच परमाणु भरलेले असतात. ते परमाणू स्वभावतः जड असल्यामुळें त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल असूं शकत नाहीं. पुढें जन्माला येणाऱ्या प्राणिमात्रांच्या अदृष्टकर्मामुळे आदिशक्तिस्वरूप जगन्मातेकडून ब्रह्मदेवाला सृष्टि निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेनंतर ब्रह्मदेव संकीर्ण असलेल्या परमाणूंचे पृथक्करण करतात. पार्थिव परमाणू, जलीय परमाणु, तैजस परमाणु आणि वायवीय परमाणु असें परमाणूंचे संकलन झाल्यानंतर दोन-दोन पार्थिव परमाणूंना एकत्र करून त्यांच्या संयोगाने द्‍व्यणुके निर्माण केली जातात. अशा तीन द्‍व्यणुकांचे एकत्रीकरण करून एक त्रसरेणु निर्माण केला जातो. हा त्रसरेणु इतका सूक्ष्म असतो की, कडोशाच्या रूपानें झरोक्यांतून घरांत येणाऱ्या सूर्याच्या किरणांतच आपण त्याला अंतराळांत परिभ्रमण करीत असलेल्या स्वरूपांत पाहूं शकतो. असे अनेक त्रसरेणु एकत्र झाले म्हणजे व्यवहारक्षम, कार्यरूप पृथ्वी उत्पन्न होते. याच पद्धतीने जल, तेज आणि वायु यांचीही पण उत्पत्ति होत असते. ही सर्व रचना आकाशाच्या उदरांत होत असल्यामुळे आकाशही निमित्तरूपानें त्यांत घटक झालेलें असतेंच. अशा या पंचमहाभूतांपासूनच ब्रह्मदेव, वृक्ष, लता, वेली, वनस्पति, डोंगर, नद, नद्या, सागर, अग्नि, विद्युत, ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र आणि विविध जातींचे वायु निर्माण करतात. याच पंचमहाभूतांपासून स्त्री, पुरुष, पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादि रूपांनीं अनंत शरीरांचीही रचना ब्रह्मदेवाकडून होत असते. यालाच आपण सृष्टि असें म्हणतो.

मनानेंही जिचे आकलन करतां येत नाहीं अशा या विशाल सृष्टिरचनेचें बह्मदेवाचें भांडवल म्हणजे आदिशक्तिस्वरूप असलेल्या जगज्जननीच्या चरणकमलांतील एक सूक्ष्म रजःकण होय. जिच्या चरणकमलाचा एक सूक्ष्म रजःकण ब्रह्मांडरूपाने नटला तिच्या संपूर्ण चरणकमलाचें स्वरूप केवढे विशाल असेल आणि त्याच्याही पलीकडे तिचे संपूर्ण नखशिखान्त स्वरूप किती विशाल असेल याचे कल्पनेलाही आकलन होत नाही ! तात्पर्य, आचार्य म्हणतात, "आई ! तुझ्या चरणकमलाच्या एका अत्यंत लहान रजःकणापासून ब्रह्मदेव अत्यंत सुस्पष्टपणे अथवा अविरतपणे या संपूर्ण स्थिरचर विश्वाची रचना करीत आहे. असा महिमा तुझ्या चरणकमलांतील एका लहानशा रजःकणाचा आहे. तर मग प्रत्यक्ष तुझा महिमा केवढा असणार ? आणि मी त्याचें वर्णन काय करणार ? " असा हा या श्लोकांतील पूर्वार्धाचा अभिप्राय झाला.

या श्लोकांतील उत्तरार्धाने भगवान विथ आणि श्रीशंकर यांच्याही दृष्टीने श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाच्या रजःकणाचा महिमा वर्णन करीत आहेत. शौरी म्हणजे भगवाच विष्णु. यदुवंशांत शूर नांवाचा राजा होऊन गेला. त्याच्याच कुलांत जन्माला आलेल्या वसुदेवाच्या पोटीं श्रीकृष्णरूपानें विष्णूने अवतार घेतला म्हणून श्रीकृष्णाप्रमाणे विष्णूला देखील शौरी असे म्हणतात. भगवाच विष्णु यांना हजारों मस्तकें आहेत. "सहस्रशीर्षा पुरुषः" असें वेदांत त्यांचे वर्णन केलेले आहे "नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे" याप्रमाणे पुराणांतही श्रीविष्णूला हजारों मस्तके असल्याचें वर्णिलेलें आहे. भगवान् श्रीविष्णू हें आपल्या हजारों मस्तकांनी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील परागाच्या अत्यंत सूक्ष्म रजःकणाला मोठ्या आदराने धारण करीत आहेत. अर्थात् त्याचें संरक्षण करीत आहेत. सृष्टीचे संरक्षण करणें हें विष्णूच्या अवतारांतील मुख्य कार्य आहे. संपूर्ण सृष्टि ही श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील परागाचा एक लहानसा रजःकण आहे हें आपण वर पाहिलेच आहे. तात्पर्य, भगवान् विष्णु देखील हें कार्य आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे, ही जाणीव ठेवून "कथमपि" म्हणजे कसें तरी अत्यंत सावध-पणाने अर्थात् अत्यंत जपून सृष्टिस्वरूप असलेल्या महात्रिरसुंदरीच्या चरणकमलातील रजःकणाचें संगोपन करीत आहेत. केवढा हा श्रीविद्यारूपी आदिशक्तीच्या चरणकमलाचा महिमा आहे ! 

भगवान् शंकरदेखील प्रलयकाळीं आपल्या सर्वांगाला आदिमाता शक्तिस्वरूप असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच चरणकमलांतील रजःकणाचा भस्म म्हणून लेप लावीत असतात. सुष्टीचा संहार करणें हें महादेवाचे कार्य आहे. म्हणून प्रलयकाळीं महादेव या सृष्टीचे अर्थात् सृष्टिस्वरूप असलेल्या महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील रजःकणाचें चूर्ण करून तें भस्म म्हणून आपल्या सर्वांगाला लावीत असतात. हाच त्यांचा भस्मोद्धूलनविधि किंवा भस्मधारणविधि होय. तात्पर्य, आई जगज्जननी ! प्रत्यक्ष भगवाच शंकर देखील तुझ्या चरणकमलांतील एका भूत-भौतिक प्रपंचरूपी सूक्ष्म रजःकणाला भस्म म्हणून आपल्या सर्वांगाला चर्चितात आणि स्वतःला पवित्र व धन्य मानतात ! असा हा तुझ्या चरणकमलांतील रजःकणाचा महिमा अद्वितीय आहे ! पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें व त्यांच्यापासून उत्पन्न झालेला भौतिक विश्वप्रपंच भस्मस्वरूपच आहे असें वेदानेंही वर्णन केलेले आहे. "अग्निरिति भस्म, वायुरिति भस्म, जलमिति भस्म, स्थलमिति भस्म, व्योमेति भस्म, सर्वं ह वा इदं भस्म, मन एतानि चक्षूंषि भस्मानि" असो. जिच्या चरणकमलांतील रजःकणाचा हा महिमा आहे तर मग प्रत्यक्ष या श्रीमहात्रिपुरसुंदरीचा महिमा किती अगाध असेल याची कल्पना करावी.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या कृतीवरून जगज्जननीच्या अगाध महिम्याचे या श्लोकांत निदर्शन केलेलें असल्यामुळें येथें  'निदर्शना' हा अलंकार मानतात. निदर्शनेच्या जोडीला स्वभावोक्ति हाही अलंकार आहेच.
 



या ऊर्ध्वमुख त्रिकोणांत ह्रीं हें बीज आहे. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचावन दिवस उत्तरेकडे तोंड करून त्याची विधिपूर्वक पूजा करावी. पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करून यंत्र सिद्ध करावे व तें दंडांत अथवा कंठांत धारण करावे. याने सर्व लोक वश होतील, प्रकृतीवर ताबा राहील आणि आरोग्य लाभेल. अनुष्ठानाच्या वेळीं सर्वत्र तुपाचा दिवा आणि उत्तम सुवासिक उदबत्ती लावलेली असावी.

Saturday, 15 September 2018

विवेकचूडामणि श्लोक २ रा

या जगात मानव म्हणून जन्म घेणे हे अवघड आहे. त्यातील अवघड गोष्टी केवळ पूर्व-पुण्याईनेच प्राप्त होतात असे पुढील श्लोक सांगतो. 

जंतूनां नर-जन्म दुर्लभमतः पुस्त्वं ततो विप्रता
तस्माद् वैदिक-धर्म-मार्ग-परता विद्‌द्वत्त्वमस्मात् परम् ।
आत्मानात्म-विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिति-
र्मुक्तिर्नो शत-जन्म-कोटि-सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥ २ ॥  


 

प्राण्यांच्या बाबतीत मनुष्य-जन्म मिळणे हे दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा पुरुष म्हणून जन्म घेणे हे अधिक दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा विप्र म्हणून जन्म हा दुर्लभ आहे. त्याहीपेक्षा वेदांनी सांगितलेल्या धर्ममार्गात तत्परता /आवड ही दुर्लभ आहे; त्याच्यापेक्षा विद्वत्ता असणे हे आणखी दुर्लभ आहे. या दुर्लभ गोष्टींचा सदुपयोग करून आत्मा आणि अनात्मा यांतील फरक जाणणे, नंतर आत्म्याचा स्वतः चांगला अनुभव घेणे, त्यानंतर ब्रह्मस्वरूपात म्हणजेच आत्मस्वरूपात मिसळून राहणे म्हणजेच मुक्ती, या गोष्टी दुर्लभ आहेत. शेकडो कोटी जन्मात केलेल्या पुण्याशिवाय मुक्ती मिळत नाही.

या श्लोकात सांगितलेल्या दुर्लभ गोष्टी अशा आहेत : - (१) मनुष्य म्हणून जन्म घेणे अवघड आहे. पूर्व कर्मांनुसार प्राणी ८४ लक्ष योनीत जन्माला येत असतो. पुढे ''एकेका योनि कोटि कोटि फेरा । नरदेहाचा वारा मग लागे ॥'' या वचनावरून माणूस म्हणून जन्म मिळणे किती अवघड आहे हे लक्षात येते. मनुष्य जन्मातच मोक्ष मिळू शकतो; मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. हा मनुष्यजन्म मिळणे कठीण आहे. (२) माणूस हा पुरुष, स्त्री, नपुंसक म्हणून जन्मास येऊ शकतो. त्यामध्ये पुरुष म्हणून जन्म मिळणे हे अवघड आहे. पुरुषजन्माला इतके महत्त्व का ? उत्तर असे दिसते. पुरुषाचे ठिकाणी धैर्य आणि स्थैर्य हे गुण प्रामुख्याने दिसतात. हे गुण मोक्षप्राप्तीस उपयोगी पडतात. म्हणून पुरुषजन्माला महत्च दिले गेले. आणखी असे दिसते की, मोक्षशास्त्र लिहिणारे बहुतेक सर्व पुरुष होते. साहजिकच त्यांनी पुरुषजन्माला महत्त्व दिले. मग प्रश्न असा की, स्त्रिया आणि नपुंसक हे मोक्षाला अधिकारी नाहीत काय ? उत्तर आहे की, ते अधिकारी आहेत. तथापि, पुरुषांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण नगण्य म्हणण्याइतके कमी आहे. साहजिकच त्यांचा स्वतंत्र निर्देश केलेला दिसत नाही. (३) विप्र म्हणून पुरुष जन्म घेणे हे अवघड आहे. शंकराचार्य हे भारतीय होते. म्हणून त्यांनी भारतीय कल्पनेनुसार विष्णू, वेद, धर्म इत्यादींचा निर्देश केला आहे. एकेकाळी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते. त्यातील पहिल्या तीहींना विप्र म्हणत. शूद्र, चांडाळ इत्यादीपेक्षा विप्रत्व चांगले. प्राचीन भारतात वर्णव्यवस्था धर्मशास्त्रानुसार होती. धर्मशास्त्रांना वेद हे प्रमाण होते. वेदांना अनुसरून असणाऱ्या धर्मशास्त्रांनी चार वर्ण आणि चार आश्रम यांची कर्तव्ये सांगितली होती. विप्र म्हणून जन्म आला तरी वेदानुसार धर्माचरण करणे हे महत्त्वाचे होते. येथे प्रश्न असा - त्रैवर्णिकाखेरीज समाजातील इतर लोक मोक्षाधिकारी नव्हते काय ? याचे उत्तर असे - केवलाद्वैत वेदांतानुसार जो कोणी साधन-चतुष्टय-संपन्न आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. तेव्हा इतर लोकांनी पूर्वजन्मी वेदाचा अभ्यास व आचरण केले असले तरी चालते. या संदर्भात 'वेदांतसार ' हा ग्रंथ सांगतो - 'अधिकारी तु विधिवद् अधीत-वेद-वेदांगत्वेन आपाततः अधिगत-अखिलवेदार्थः अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा । ' आणखी असे - स्त्रियांप्रमाणेच शूद्र इत्यादी तुरळकपणेच मोक्ष मिळविणारे होते असे दिसून येते. तसेच मोक्षशास्त्रावर लिहिणारे बहुतेकजण त्रैवर्णिक असल्याने त्यांनी इतरांकडे दुर्लक्ष केले असावे. आणखी असे - विप्रत्व हा शब्द सत्त्वगुण सुचवितो असे म्हटले तर शूद्र इत्यादी सात्त्विक स्वभावाचे असतील तर ते मोक्षाधिकारी होऊ शकतात. (४) पहिल्या तीन वर्णांतील सर्वचजण वेदाचे अध्ययन करीत, असे नव्हते. वेदाला अनुसरून धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या धर्माचे आचरण केल्याने चित्त शुद्ध होण्यास मदत होते आणि चित्तशुद्धी ही मोक्षमार्गावर आवश्यक आहे. म्हणून वेदप्रणीत धर्माचे आचरण महत्त्वाचे ठरते. (५) मोक्षासाठी आत्मानात्मविवेक हा अति आवश्यक आहे. तो येण्यास विद्वत्ता हवी. ग्रंथांचे श्रवण, मनन, इत्यादींच्याद्वारा विवेकबुद्धी येणे म्हणजे विद्वत्त्व. साधकबाधक गोष्टींचा विचार करून काहीतरी निश्चय करणारा विद्वान असतो. या विद्वत्तेलाच पुढे श्लोक ४ मध्ये ''श्रुति-पार-दर्शन'' असे म्हटले आहे. असली विद्वत्ता मोक्षमार्गात आवश्यक आहे. (६) वरील दुर्लभ गोष्टी मिळाल्याने सर्व काम भागत नाही. 'आत्मा हा एकमेव एक अंतिम सत्यतत्त्व आहे आणि बाकी सर्व अनात्मा आहे', ही गोष्ट पटणे व मनात ठसणे आवश्यक आहे. आत्मा नित्य आहे. अनात्मा अनित्य आहे. अनात्मा असणारे विश्व अनित्य आहे. हे पटले तर विश्वातील अनित्य वस्तू-विषयीची आसक्ती दूर होऊन वैराग्य येईल. वैराग्य ही मोक्षाची पहिली पायरी आहे. त्यासाठी आत्मानात्मविवेक दृढ होणे नितांत आवश्यक आहे. (७) उपनिषदांच्या अभ्यासाने कळते की नित्य असणारा आत्मा अंतिम सत्यतत्त्व आहे आणि तोच आपला आत्मा - अंतरात्मा - आहे. पण या शाब्दिक ज्ञानाचा उपयोग नाही. हा आत्मा सच्चिदानंद आहे. आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येणे गरजेचे आहे. कारण अनुभव हीच खात्री. (८) हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आत्मानुभव म्हणजेच ब्रह्मानुभव. या ब्रह्मानुभवाने ब्रह्माचा अनुभव घेणारा ब्रह्मरूप होऊन जातो (ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति । ). असे ब्रह्मरूप होऊन जाणे, ब्रह्मरूपाने राहणे हाच मोक्ष आहे (ब्रह्मभावश्च मोक्षः । ).

मोक्ष म्हणजे तरी काय ? संसाराच्या बंधनातून सुटका म्हणजे मोक्ष. संसार म्हणजे जन्ममरणाचा फेरा. तेव्हा संसारातून सुटका म्हणजे जन्ममरणातून सुटका. मोक्षात जीव ब्रह्मरूप होतो. ब्रह्म हे सच्चिदानंद आहे. म्हणून ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. संसारातील सुखदुःखांचा अभाव म्हणजे परमानंद नव्हे, तर नित्य निर्विषय आनंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे आणि मोक्ष मिळविणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.

अनेक दुर्लभ गोष्टी मिळत गेल्यास माणूस दुर्लभ मोक्ष मिळवू शकतो. साहजिकच एकाच जन्मात मोक्ष मिळेल असे नाही. गीतेने म्हटल्याप्रमाणे 'अनेक्तजन्म-संसिद्ध' असा पुरुष मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतो. येथे प्रश्न असा - शंकराचार्य, ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी, एकनाथ महाराज हे एकाच जन्मात मुक्त झाले असे दिसते. ते कसे काय ? याचे उत्तर नामदेव महाराजांनी दिले आहे - 'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥'

प्रस्तुतच्या श्लोकात असे म्हटले आहे - 'शेकडो कोटी जन्मात चांगल्या प्रकारे केलेल्या पुण्यकर्मांनी मुक्ती मिळते. येथे 'चांगला प्रकार' हे शब्द महत्त्वाचे आहेत. उदा., दान देणे हे पुण्य आहे पण ते दान त्रागा करून, आदळआपट करून, वाईट तोंड करून देणे हा प्रकार चांगला नव्हे. तर 'दान हे आवश्यक आहे', इत्यादी चांगली बुद्धी बाळगून दान करावयास हवे म्हणजे चांगला प्रकार होईल.

केवलाद्वैतमतानुसार कोणत्याही प्रकारच्या कर्मांनी मोक्ष मिळत नाही (पहा श्लोक ७, ११, ५८, इत्यादी) मग येथे पुण्यकर्मांनी मोक्ष मिळतो असे का म्हटले आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे - साक्षात् कर्मांनी मोक्ष मिळत नाही. तथा, चांगल्या कर्मांनी मोक्षासाठी आवश्यक पण दुर्लभ अशा ज्या गोष्टी या श्लोकात सांगितल्या आहेत, त्या मिळू शकतात. तसेच कर्मांनी चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी ही आवश्यक बाब आहे. अशाप्रकारे कर्मे ही अप्रत्यक्षपणे मोक्षप्राप्तीला उपयोगी ठरतात.

आणखी एक प्रश्न असा - श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांनी ब्रह्मसाक्षात्कार होऊन मोक्ष मिळतो असे या ग्रंथातच पुढे सांगितले आहे. मग प्रश्न असा - श्रवण इत्यादी कर्मे नाही काय ? याचे उत्तर असे - तांत्रिकदृष्ट्या श्रवण इत्यादी कर्मे आहेत. पण ती मोक्षासाठी असल्याने आणि ती कर्माच्या बंधनात पाडीत नसल्याने, ती नेहमीच्या 'कर्म' या सदरात गणली जात नाहीत. जसे - इच्छा ही बंधनात पाडणारी आहे पण मोक्षाची इच्छा ही इच्छा असली तरी ती बंधनात पाडीत नाही म्हणून ती नेहमीच्या 'इच्छा' या वर्गात मोडत नाही.

आणखी असे - येथे 'शेकडो कोटी जन्मातील पुण्य' असे म्हटल्याने ते पुण्य 'अनंत' होते. मग ते 'पुण्य' या नेहमीच्या सदरात पडत नाही. अगणित अथवा अनंत पुण्य हे नेहमीच्या 'पुण्य' या वर्गात पडत नाही. त्यामुळे 'अनंत पुण्याने मोक्ष' असे म्हटले तरी बिघडत नाही.

सौन्दर्यलहरी श्लोक १ ला

शिवा शक्त्या युको यदि भवतिशक्तः प्रभवितुं
नचेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि
अहस्त्वामाराध्यां हरि-हर-विरिञ्चादिभिरपि
प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ॥ १ ॥


भगवान् शिव हे जर शक्तीनें युक्त असतील तरच ते सर्व कार्य करण्यास समर्थ होतात. ते शक्तियुक्त नसतील तर त्यांच्या ठिकाणी खरोखर स्पंदन करण्याचेंही सामर्थ्य असूं शकत नाहीं ! म्हणून हे सकलशक्तिस्वरूपिणी माते ! ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी देखील आराधना करण्यास योग्य असलेल्या तुझ्या चरणी प्रणाम करण्यास किंवा तुझी स्तुति करण्यास, ज्याच्या पदरीं पुण्याची सामग्री नाहीं असा कोण बरें समर्थ होईल ?  अर्थात पदरीं पुण्याची सामग्री असल्याशिवाय तुझ्या चरणी प्रणाम करण्याची बुद्धि होणार नाहीं आणि तुझी स्तुति करण्याचीही पण बुद्धि होणार नाहीं. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे.

" देवः शिवः यदि शक्त्या युक्तः भवति तदैव प्रभवितुं शक्तः, एवं न चेत् सः स्पन्दितु अपि खलु कुशलः न । अतः हरिहरविरिञ्चादिभिः अपि आराध्या त्वां प्रणन्तुं स्तोतुं वा अकृतपुण्यः कथं प्रभवति ॥ " असा या लोकाचा अन्वय आहे.

आतां आपण या श्लोकाच्या विशेष अर्थाचा विचार करूं. श्रीराजराजेश्वरी श्रीविद्यास्वरूप असलेली ललितामहात्रिपुरसुंदरी ही या स्तोत्राची अधिष्ठाची देवता आहे. ती शुद्धचैतन्यस्वरूप आहे. तिलाच आदिमाया चिच्छक्ति अथवा केवलशक्ति असेही म्हणतात. उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय यारूपानें या विश्वप्रपंचाची जी अविरत घडामोड चाललेली आहे त्याच्या मुळाशीं तीच शक्ति कारणीभूत आहे. ती अनादि आणि अनंत असल्यामुळें तिला सनातन असेंही म्हणतात. अभिव्यक्त होणाऱ्या सर्व कार्यांचा ती शक्ति आश्रय असून तीच सर्व कार्यांच्या रूपाने नटते. याच अभिप्रायानें " सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाभये गुणमयि नारायणि नमास्तु ते " असें मार्कण्डेय पुराणांत तिचे वर्णन केले आहे.

यावर कोणी असें विचारील कीं, अहो या विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाला आदिविष्णु अथवा आदिनारायण असें म्हणतात. "विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता" अशा लगी शब्दांनीच त्याचें वर्णन केले आहे. शक्तितत्त्व हें विश्वाच्या उत्पत्तीचे अथवा प्रवृत्तीचे मूळ आहे असें तत्त्ववेत्ते मानीत नाहीत. पण ही आशंका बरोबर नाहीं. विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाचें प्रतिपादन करणारा शब्द पुंल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे हा खरा महत्वाचा मुद्दा नसून त्या तत्त्वाचे स्वरूप काय आहे ? हाच खरा महत्त्वाचा विषय आहे. स्नेही अथवा मित्र या अर्थाने प्रतिपादन करणारा संस्कृतमधला मित्र शब्द नपुंसकलिंगी आहे. जल अथवा पाणी या अर्थाचा संस्कृतमधील "आप" शब्द स्त्रीलिंगी आहे पत्नी अथवा स्त्री या अर्थाचा संस्कृतमधील "दार" शब्द पुंलिंगी आहे. याप्रमाणे शब्दाचे लिंग भिन्न असलें तरी अर्थामध्यें भेद होत नाहीं. याच न्यायानें विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाला आदिनारायण, आदिविष्णु, आदिशिव असे शब्द योजले काय किंवा आदिमाया, आदिशक्ति असे शब्द योजले काय, तत्त्वांत कांहींच फरक पडत नाही.

आदिभगवान्, आदिविष्णु, आदिनारायण अथवा आदिशिव इत्यादि शब्दांनी ओळखले जाणारे, विश्वाच्या मुळाशी असलेलें जें सोपाधिक चित्तत्त्व त्या तत्त्वाचेंही अधिष्ठान असलेलें जें निरुपाधिक चित्तत्त्व तेंच प्रकृतस्थळी आचार्यांना आदिशक्ति, महाशक्ति अथवा केवलशक्ति या शब्दाने विवक्षित आहे. याच शक्तीच्या प्रेरणेने परमात्मा ब्रह्मा, विष्णु आणि शिव या रूपानें नटला अनुक्रमे सर्व जगाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय ही कार्य करूं लागला ! शक्तीशिवाय प्रेरणा नाहीं हा सिद्धान्त निर्विवाद आहे. याच शक्तीमुळे अव्यक्ताच्या ठिकाणी " तदैक्षत, बहुस्याम्, प्रजायेय " या वाक्यांत सांगितल्याप्रमाणें ईक्षण आणि बहुरूपानें नटण्याच्या संकल्पाचे स्फुरण अभिव्यक्त झाले. याच शक्तीमुळे परमात्मा बहुरूपाने नटूं शकला. याच परमात्म्याला कोणी आदिविष्णू म्हणतात तर कोणी आदिशिव असेही म्हणतात.

आदिविष्णूच्या किंवा आदि शिवाच्या ठिकाणी असलेली ही शक्ति त्यांच्याहून निराळ्या स्वरूपाने पहाता येत नाहीं म्हणूनच शक्ति आणि शक्तिमान् यांच्यामध्ये अभेद मानला जातो. लौकिक व्यवहारामध्ये देखील शक्तीने शक्तिमानाला सोडले कीं तो शक्तिमान् पूर्वींप्रमाणे शक्तिमान या स्वरूपांत शिल्लक उरत नाही. तो शक्तिहीन अर्थात् अचेतन, जड होतो. याच मूलशक्तीला  'चिच्छक्ति' असें म्हटलेले आहे. हीच चिच्छक्ति भिन्नभिन्न पदार्थांमध्ये त्या त्या पदार्थांच्या विशिष्ट शक्तीच्या रूपाने प्रतीतीला येत असते. याच अभिप्रायाने "अम्बास्तव" नांवाच्या स्तोत्रांत या शक्तीचे वर्णन करतांना "हे जगज्जननी अम्बे ! चंद्रामध्ये आल्हाददायक असलेली चंद्रिका हें तुझेच रूप आहे. सूर्यामध्ये प्रखर तेजाच्या रूपानें तूंच विराजमान झालेली आहेस. पुरुषांमध्यें चैतन्यरूपानें तूंच वास्तव्य करतेस. चराचर सर्व भूतांना प्राणदान देण्याचे अथवा बल देण्याचें वायूमध्ये असलेले सामर्थ्यही तूंच आहेस. गोडीच्या रूपाने पाण्यांत आणि उष्णतेच्या रूपाने अग्नींत तूंच रहातेस. फार काय सांगावे, या विश्वातील पदार्थमात्रांत साररूपानें तूंच रहातेस. साररूपानें सर्वत्र तूं आहेस म्हणूनच हें विश्व रमणीय आहे. तूं जर या विश्वांतील पदार्थांना सोडलेस तर हे सारे पदार्थ असार, तुच्छ, त्याज्य असेच होतील.  "त्वं चन्द्रिका शशिनि तिग्मरुचौ रुचिस्त्वं, त्वं चेतनाऽसि पुरुषे पवने बलं त्वम् । त्वं स्वादुताऽसि सलिले शिखिनि त्वमूषा, निःसारमेव निखिलं त्वदृते यदि स्यात् । "

याच शक्तीचे आणखी एका ठिकाणीं स्तवन करतांना असें म्हटलें आहे कीं, हें आई जगदंबे ! या त्रैलोक्यामध्ये साऱ्या शब्दप्रपंचाची व विश्वप्रपंचाची जननी तूंच आहेस. तुलाच वाग्वादिनी अथवा सरस्वती असें म्हणतात. तुझ्यापासूनच सृष्टीच्या आरंभी ब्रह्मा, विष्णु, महेश त्याचप्रमाणे इन्द्र, वरुण, कुबेर इत्यादि देव प्रकट होतात आणि सृष्टीच्या अंती खरोखर ते सर्व तुझ्यामध्येच लीन होतात ! खरोखर तुझा रूपमहिमा अचिंत्य आहे. तुझें काय वर्णन करावे ? "सर्वश्रेष्ठ शक्ति" याच एका शब्दानें तुझें वर्णन केलें जातें ! "शब्दानां जननी त्वमत्र भुवने वाग्वादिनीत्युच्यसे, त्वत्तः केशव-वासव-प्रभृतयोऽप्याविर्भवन्ति ध्रुवम् । लीयन्ते खलु यत्र कल्पविरमे ब्रह्मादयस्तेऽप्यमी, सा त्वं काचिदचिन्त्यरूपमहिमा शक्तिः परा गीयसे ॥ "

असो, ही शक्ति ज्याच्यामध्ये वास्तव्य करते ती त्याच्याहून निराळी दिसत नाहीं. म्हणून शक्ति आणि शक्तिमान हे दोघेही एकरूपच मानले जातात. वस्तुतः ते एकरूपच आहेत. शक्ति आणि शक्तिमान यांच्यांत भेद मानणें हें अपरिपक्व विचारांचेंच द्योतक आहे. एकाग्र चित्ताने तत्त्वचिंतन करणाऱ्या योग्यांना - तत्त्ववेत्त्यांना - शक्ति आणि शक्तिमान यांच्यांत भेद दिसत नाहीं. "शक्तिशक्ति मतोर्भेदं वदन्त्यपरमार्थतः । अभेदमनुपश्यन्ति योगिनस्तत्त्वचिन्तकाः"  (कूर्मपुराण). तात्पर्य, चिच्छक्ति, महाशक्ति, आदिशक्ति, शक्ति, अम्बा, जगज्जननी, दुर्गा, भवानी, ललिता, महाविद्या, श्रीविद्या, महात्रिपुरसुंदरी, महामाया इत्यादि सर्व नांवे एकाच तत्त्वाची आहेत.

आतां आपण "शिव" या शब्दाच्या अर्थाचा विचार करूं. शिव म्हणजे मंगलमय कल्याणस्वरूप सदाशिवतत्त्व. यालाच परमात्मा आदिविष्णु अथवा आदिशिव असेही म्हणतात. जन्ममरणादिरूप कोगत्याही विकाराचा ज्याला तिळमात्रही स्पर्श नाहीं, आध्यात्मिक, आधिदैविक अथवा आधिभौतिक अशा त्रिविध दुःखांपैकी कोणत्याही दुःखाचा ज्याच्या ठिकाणीं लेशही नाहीं; कोणत्याही प्रकारचे अशुभ, अमंगल ज्याच्या ठिकाणी नाहीं तो सदासर्वकाळ नित्य निरतिशय आनंदरूप असलेला परमात्मा हाच या ठिकाणी शिव शब्दाचा अर्थ आहे. 'वश्' या धातूपासून शिव शब्द निष्पन्न झालेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या इच्छाशक्तीचा तो आश्रय असल्यामुळें त्याला शिव असें म्हणतात. "वष्टि इति शिवः" अशी शिव शब्दाची व्युत्पत्ति आहे. 'वश्' धातूचा अर्थ प्रकाशणें असा घेतल्यास "वशति" म्हणजे प्रकाशतो तो शिव. अर्थात स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असलेला परमात्मा असा त्याचा अर्थ होतो. तो स्वतः स्वयंप्रकाश आहे, एवढेच नसून तो आपल्या प्रकाशाने साऱ्या विश्वालाही प्रकाशित करतो म्हणूनही त्याला शिव असे म्हटलेले आहे.

यावर कोणी असें विचारील की, अहो ! वश् धातूवरून शिव शब्द कसा निष्पन्न होणार ? पुढचा श मागें व मागचा व पुढे कसा गेला ? याला उत्तर असें कीं, क्वचित् प्रसंगीं असा वर्णविपर्यय होतो, अर्थात् विपरीत वर्णरचना होते. ही गोष्ट व्यवहारसिद्ध आहे. हिंस्र म्हणजे मारणें, ठार करणें या धातूपासून सिंह  शब्द बनला. दृश् पश्य पहाणे या धातूपासून पश्यक शब्द बनावयाचा, पण व्यवहारामध्ये पश्यक या शब्दाऐवजी कश्यप हाच शब्द रूढ असल्याचें दिसत आहे. याच न्यायाने वश् धातूपासून वर्णविपर्ययानें शिव शब्द निष्पन्न होऊन व्यवहारांत रूढ झाल्याचे दिसत आहे. मराठी भाषेंतही कोठे कोठे हा गमतीचा प्रकार पहावयास सांपडतो. अरसा या शब्दांतील रस शब्दाचा अर्थ पारा असा आहे. कांचेच्या एका बाजूस पारा लावला म्हणजे ती कांच प्रतिबिंब ग्रहण करण्यास योग्य बनते. वस्तुतः ही कांच रसाने म्हणजे पाऱ्याने युक्त झाल्यामुळे सरस झाली. पण व्यवहारांत तिला आपण आरसा म्हणतो  ! त्याचप्रमाणे वधूला वरण्यासाठी आलेल्या वरदेवाला उद्देशून आपण नवरदेव असा शब्दप्रयोग करतो.  याप्रमाणें मराठी भाषेत रूढीने वराचा नवरा केला. त्याचप्रमाणे वश् धातूपासून रूढीने शिव शब्द निष्पन्न झाल्याचें दृष्टीस पडते "हिंसि धातोः सिंहशब्दो, वशकान्तौ शिवः सूतः । वर्णव्यत्ययतः सिद्धौ पश्यकः कश्यपो यथा ॥ "

शी धातूचा अर्थ निद्रा घेणे व वा धातूचा अर्थ फेकणे, दूर टाकणे. या दोन धातूंपासून निष्पन्न झालेल्या शिव शब्दाचा अर्थ ज्यानें अज्ञानरूपी निद्रेला फेकून दिलेले आहे तो सदासर्वकाळ जागृत असलेला परमात्मा असाही करतात. वा धातूचा अर्थ वाहणे, जाणें असा केल्यास निद्रा शब्दाने उपलक्षित असलेल्या अज्ञानाला - अविद्येला अथवा मायेला धारण करून जीवभावाला प्राप्त होणारा परमात्मा असाही शिव शब्दाचा अर्थ करतात. तात्पर्य, कोणतीही व्युत्पत्ति घेतली तरी शिव शब्दाचा अर्थ परमात्मा भगवान सदाशिव असाच होतो. हा परमात्माच ब्रह्मा, विष्णु आणि शंकर या रूपाने नटतो व अखिल विश्वप्रपंचाचे उत्पादन, परिपालन आणि नियमन करीत रहातो. शिवस्वरूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणीं हे सर्व सामर्थ्य आले कोठून ? यावर आचार्य उत्तर देतात, शिव म्हणजे परमात्मा. हा जेव्हां शक्तीने युक्त होतो तेव्हांच तो हें सर्व कार्य करण्यास समर्थ होतो. शिव शब्दांत असलेला इकार हा शक्तीचा वाचक आहे. शिव शब्दांतून तो इकार काढल्यानंतर राहिलेल्या शब्दाला कांहीं महत्त्वाचा अर्थ उरत नाहीं. शक्तिविरहित झालेला शिव हा शवासारखा जड अचेतन बनतो ! शक्तीमुळेच शिवाला देवपण आले आहे. शक्तीने त्याला सोडले कीं, तो तिळमात्रही हालचाल करूं शकत नाही. "न खलु कुशलः स्पन्दितुमपि" खरोखर स्पंदन करण्याचेंही सामर्थ्य त्याच्या ठिकाणी उरत नाहीं, मग तो विश्वाची घडामोड काय करणार ? तात्पर्य, परमेश्वराच्या ठिकाणी "कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं" असें जें सामर्थ्य आहे तें सर्व शक्तीमुळेच आहे. हे शक्तिस्वरूपिणी माते महात्रिपुरसुंदरी ! हा सर्व तुझाच प्रभाव आहे.

व्यवहारांमध्यें देखील वधूवर हे लक्ष्मीनारायणस्वरूप अथवा शिवशक्तिस्वरूपच मानले जातात. त्यांत वधू ही लक्ष्मीस्वरूप अथवा शक्तिस्वरूप आहे. या शक्तीचें साहाय्य नसेल तर वर हा नारायणस्वरूप अथवा शिवस्वरूप असूनही प्रपंचक्षमता त्याच्या ठिकाणी असूं शकत नाहीं ही गोष्ट प्रसिद्धच आहे. जें पिंडीं तें ब्रह्मांडीं हा न्याय प्रसिद्धच आहे.

अशा रीतीनें सर्व विश्वाची आधारशक्ति, ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति सर्व कांहीं श्रीमाता ललिता ललितामहात्रिपुरसुंदरीच असल्यामुळें ब्रह्मा विष्णू आणि रुद्र त्याचप्रमाणे इंद्र, वरुण, कुबेर, अग्नि आणि वायु इत्यादि देवही आपआपल्या अंगीकृत कार्याचें अर्थात् तें निर्वेधपणे पार पाडण्याचे सामर्थ्य आपल्याला लाभावे म्हणून तिची आराधना करीत असतात. सकलांचे सकल मनोरथ पूर्ण करण्याला तीच समर्थ असल्यामुळें या विश्वांत आराधना करण्याला तीच योग्य आहे .आचार्य म्हणतात, "आई ! तुझ्या अंगीं असलेले हे स्वतःसिद्ध गुण लक्षांत घेऊन मी तुझी स्तुति करण्यास प्रवृत्त झालो आहें. नसते गुण तुझ्या अंगीं कल्पून मी कांहीं तुझी खोटी स्तुति करीत नाही. आई ! तुझी स्तुति करण्याला अथवा तुझ्या चरणी प्रणाम करण्याला देखील पूर्वी कांहीं सुकृताची शिदोरी संपादन केलेली असेल तरच तो समर्थ होऊं शकेल. पदरीं पूर्वार्जित पुण्याची सामग्री नसेल तर तुझ्या चरणी प्रणाम करणें किंवा तुझी स्तुति करणें हे त्याला घडणार नाहीं."

भक्तांची सर्व दुःखे हरण करतो म्हणून विष्णूला हरि असें म्हणतात. प्रलयकालीं सर्व सृष्टीचा संहार करण्याचें कार्य महादेवाकडे असल्यामुळे महादेवाला हर असें म्हणतात. "विशेषेण रिञ्चति इति विरिञ्चः" विशेषेंकरून भौतिक सृष्टि निर्माण करतो म्हणून ब्रह्मदेवाला 'विरिञ्च' असें म्हणतात. हरिहरादिकांवर जसा तूं अनुग्रह करतेस तसाच माझ्यावरही पण कर. असा आचार्यांचा यांतील गर्भितार्थ आहे. या श्लोकातील शिव, शक्ति इत्यादि सर्व शब्द अभिप्रायगर्भित असल्यामुळें साहित्यशास्त्राच्या दृष्टीने परिकरालंकार होतो ! तसेंच पूर्वार्धांतील विषय उत्तरार्धांतील विषयाला कारणीभूत असल्यामुळें काव्यलिंग या नांवाचाही अलंकार आहेंच. श्लेष आणि समासोक्ति हेही अलंकार दृष्टीस पडतात. मंगलमय ध्येयभूत वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन हा तर सर्वांत मोठा अलंकार आहे. हें संपूर्ण स्तोत्र शिखरिणी वृत्तांत आहे. या वृत्तांत चार चरण असून प्रत्येक चरणांत सतरा अक्षरें असतात. सहाव्या आणि अकराव्या अक्षरावर विराम असतो. क्रमाने य्गण, मगण, नगण, सगण आणि भगण अशी गणांची योजना असून त्यापुढे एक लघु अक्षर आणि एक गुरु अक्षर असतें. "रसै रुद्रैश्छिन्ना यमनसभलागः शिखरिणी"

या स्तोत्रांतील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप असल्यामुळें त्याचें सबीज यंत्र, त्याची पूजा-अनुष्ठान पद्धति व त्याचें फल इत्यादि सर्व प्रकार आंग्ल, केरळ, द्रविड, तामिळ, आंध्र आणि संस्कृत अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध आहेत. आम्ही मराठीच्या जिज्ञासू वाचकांना त्याचा संक्षिप्त परिचय येथे देत आहों. यद्यपि कर्म हें निष्काम बुद्धीने अर्थात परमेश्वरार्पणबुद्धीनेच अतुष्ठिलें जाणें  श्रेयस्कर असतें. तथापि, एखाद्या काम्य फलाची कामना अपरिहार्य असेल आणि त्यांत कोणाचा द्वेष, मत्सर अथवा शोक, दुःख अभिप्रेत नसेल तर तें काम्य कर्मही करावयास हरकत नाहीं. 



हें यंत्र तांदळाचे पीठ कालवून स्थंडिलावर काढावे. त्याची पूर्वेकडे तोंड करून शास्त्रोक्त पूजा करावी. गूळ, नारळ आणि केळांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा लाबून बारा दिवस रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. सकल कार्यसिद्धि हें याचे फळ आहे. सोन्याच्या पत्र्यावर यंत्र काढून याच पद्धतीने तें सिद्ध करावें व कंठांत धारण करावें.

Friday, 14 September 2018

सौन्दर्यलहरीस्तोत्रम् - प्रास्ताविक

सौन्दर्यलहरीस्तोत्रम् - प्रास्ताविक

संस्कृत भाषेतील स्तोत्रवाङ्‍ग्‍मयात सौंदर्यलहरी या स्तोत्राचे स्थान फारच उच्च कोटीचे आहे. हें स्तोत्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा आत्मा आहे. श्रीशक्तिदेवीच्या उपासनाक्षेत्रांत कांहीं घडले नाहीं तरी निदान सौंदर्यलहरी या स्तोत्राचा पाठ तरी अवश्य घडावा. या स्तोत्राच्या पाठानेंही श्रीविद्येची उपासना घडते असे या स्तोत्राचें माहात्म्य आहे. प्रायः सात्विक, सुविद्य आणि सुस्थितीतील लोकच या उपासनेच्या क्षेत्रांत पदार्पण करीत असतात. अथवा भाग्याने जे कोणी श्रीविद्येची उपासना करतात, त्यांना ते सात्विक, सुविद्य आणि सुस्थितीतील म्हटलें जाईल अशीच अवस्था श्रीदेवी भगवतीच्या कृपेने प्राप्त होत असते असें दृष्टीस पडते. असा हा श्रीविद्येच्या उपासनेचा महिमा आहे. या सर्व फलापेक्षांही तात्विकदृष्ट्या शुद्ध समाधानाचा लाभ होणें हे श्रीविद्येच्या उपासनेचें असाधारण फल आहे. तांत्रिकदृष्ट्या श्रीविद्येची उपासना घडणे हें अत्यंत दुरापास्त आहे. श्रीविद्येच्या उपासनेत श्रीचक्रपूजेला अथवा श्रीयंत्राच्या पूजेला अग्रस्थान आहे. या श्रीयंत्राची माहिती श्रीसौंदर्यलहरीस्तोत्राच्या अकराव्या श्लोकांत दिलेली आहे. श्रीचक्राच्या पूजेचे फल अत्यंत श्रेष्ठ असेल यांत नवल काय, केवळ भक्तियुक्त अन्तःकरणानें श्रीयंत्राचे दर्शनही घेतलें तरी सांगोपांग शंभर यज्ञ केल्याचे, सोळा महादानें दिल्याचें आणि साडेतीन कोटि तीर्थामध्ये स्नान केल्याचे फळ मिळतें, असा श्रीचक्राच्या दर्शनाचा महिमा शास्त्रांत वर्णिलेला आहे. [तीनरंगी श्रीचक्रचित्रांतील लोक पहा.]

श्रीविद्येच्या उपासनेच्या दृष्टीने आचार्यांनीं केलेली भवानीभुजंगमस्तोत्र, देवीभुजंगमस्तोत्र, कल्याणवृष्टिस्तोत्र, मंत्रमातुकामानसपूजास्तोत्र ही स्तोत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. मानसपूजेच्या दृष्टीने आचार्यांनी केलेली श्रीत्रिपुरसुंदरी देवीची आणखी एक-दोन स्तोत्रे चांगली आहेत. पण तीं मोठी असल्यामुळें त्यांचा अंतर्भाव इथे करतां येत नाही. तथापि जी स्तोत्रे इथे दिली आहेत तीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेला अत्यंत उपयुक्त अशींच आहेत. त्यांतही ही सौदर्यलहरी म्हणजे फारच महत्त्वाचे स्तोत्र आहे  'सर्वे पादा हस्तिपदे निमग्नाः' या न्यायाने सर्व स्तोत्रांचा भाव यांत समाविष्ट झालेलाच आहे. भगवद्‌गीतेच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास हे स्तोत्र "सर्वतः सम्प्तुतोदके" अथांग जलाने भरलेल्या महासागरासारखे सर्वांग संपूर्ण आहे: अथवा श्रीविद्येच्या उपासना-साधन-मंदिराचा हे स्तोत्र कळस आहे असें म्हटलें तरी त्यांत अतिशयोक्ति होणार नाहीं. या स्तोत्राने संस्कृत भाषेतील महा-महा विद्वानांची मने आपल्याकडे आकृष्ट करून घेतलेली आहेत. या स्तोत्रावर प्राचीन विद्वानांच्या छत्तीस टीका उपलब्ध आहेत, हीच एक गोष्ट या स्तोत्राचे बड्या-बड्या विद्वान्  लोकांना केवढे आकर्षण वाटत आहे, हें लक्षांत घेण्यास पुरेशी आहे. अशा या अधिकारी आणि  विद्वान लोकांनी पुरस्कारलेल्या श्रीसौंदर्यलहरीचा महिमा मी काय वर्णन करणार ? आणि तो कोणत्या शब्दानी वर्णन करणार ? असें हें अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र मराठी भाषेच्या भाविक भक्तांच्या हातीं देतांना मनाला अत्यंत आनंद वाटत आहे. हें स्तोत्र म्हणजे आचार्यांनी श्रीविद्येच्या भाविक भक्तांना दिलेला हा एक अपूर्व आनंदाचा निधीच आहे.

आचार्यांना हें स्तोत्र कोणत्या वयांत व कसें स्फुरले ! याचा इतिहास, मोठा मनोरम आहे. [तो वाचकांनी सुबोधस्तोत्रसंग्रहाच्या पहिल्या भागांत दिलेल्या आचार्यांच्या संक्षिप्त चरित्रांत पान एक्कावनमध्यें "काव्यस्फूर्ति" या सदरांत अवश्य पहावा.]  हे स्तोत्र आचार्यानीं केलेले नसावे अशी शंका एक-दोन विज्ञानांनी घेतलेली आहे. पण त्यांचा युक्तिवाद अगदीच पोकळ असल्यामुळें असंख्य विद्वानांनीं तिकडे लक्षच दिलेले नाही. एवढेच नव्हे तर हें स्तोत्र निश्चित आचार्यांनींच केलेले आहे असा आपला निर्वाळा देऊन बहुसंख्य विद्वज्जनांनी या स्तोत्राचा पुरस्कार केलेला आहे. आपणही या निरर्थक असलेल्या शंका-कुशंकांच्या कर्दमापासून आपल्याला अलिप्त ठेवावे हेंच श्रेयस्कर होय.

अशीही एक आख्यायिका आहे कीं, एकदा भगवाच आद्य श्रीशंकराचार्य कैलासावर गेले. तेथें पार्वतीसह विराजमान असलेल्या शंकरांना पाहून त्यांनीं भक्तिभावानें साष्टांग प्रणिपात केला. आशुतोष भगवान् शंकर प्रसन्न झाले. म्हणाले काय पाहिजे आहे ? आचार्यांनी उत्तर दिलें, कृपा करून आपण मला सौंदर्यलहरी द्या. शंकरांनी सौंदर्यलहरीचीं लिहिलेली पाने आचार्यांच्या स्वाधीन केली ! आचार्य तीं पाने घेऊन निघाले तोंच नंदिकेश्वराची दृष्टि त्यांच्यावर गेली. तो नंदी आचार्यांच्या अंगावर झपाड्याने धावला ! त्यानेंआचार्यांच्या हातांतील कांहीं पाने तोंडाने हिसकावून घेतली. राहिलेली पाने, हातांत घेऊन आचार्य मोठ्या लगबगीने धूम ठोकून भूमंडलावर आले. निवांतपणे बसून श्लोकांची जुळवाजुळव करूं लागले. तो काही श्लोक खंडित असल्याचें आढळून आलें. त्यांनीं पुन्हा शंकरांची आराधना केली. शंकरांच्या कृपेने त्रुटित झालेले श्लोक त्यांना स्फुरले आणि संपूर्ण सौंदर्यलहरी हातीं आल्याचा आनंद झाला. तीच ही सौंदर्यलहरी आहे. कांहीं असो, आख्यायिका या निर्णायक नसल्या तरी सौंदर्यलहरी हें स्तोत्र अलौकिक आहे यांत शंकाच नाही. अशा या अलौकिक स्तोत्राचा लाभ आचार्यांकडूनच जनतेला झाला आहे हेही तितकेच निश्चित होय.

कांहीं लोक सौंदर्यलहरीचे दोन भाग मानतात. एक्केचाळीस श्लोकांच्या पहिल्या अंशाला आनंदलहरी असें म्हणतात, तर एकूणसाठ श्लोकांचा दुसरा अंश सौंदर्यलहरी म्हणून मानला जातो. कांहीं लोकांच्या मताने सौंदर्यलहरीचे लोक एकशेएक आहेत, तर कांहीं ग्रंथांत एकशेदोन व एकशेतीनही श्लोक असल्याचें दृष्टीस पडते. पहिला अंश मननाला योग्य अशा त्रिपुरसुंदरीच्या तात्त्विक स्वरूपाचे प्रतिपादन करीत आहे, तर दुसरा अंश ध्यानाला योग्य अशा तिच्या सगुण स्वरूपाचें प्रतिपादन करीत आहे. प्रायः लोकव्यवहारामध्ये या दोन्ही अंशांना मिळून सौंदर्यलहरी हें एकच नांव दिलेले आढळतें.

साहित्यशास्त्राच्या दृष्टीनेंही या स्तोत्राकडे दृष्टि टाकल्यास हें स्तोत्र हें एक अद्वितीय काव्य आहे, असेंच कोणालाही मान्य करावे लागेल, अशीच या स्तोत्राची रचना आहे. तंत्रशास्त्र, मंत्रशाख, योगशास्त्र, आणि तत्त्वज्ञान यांतील गूढ रहस्ये इतक्या सहज रीतीनें यांत समावलेलीं आहेत कीं, सामान्यपणे स्तोत्र म्हणतांना चटकन् तीं लक्षांतही येत नाहींत. अनेक विद्वानांनी याच्यावर इतक्या टीका लिहिल्या त्यांतील रहस्यही हेंच आहे. शाखीय सिद्धान्त अवघड, पण ते मोठ्या गोड शब्दांत येथें मांडलेले आहेत. "कान्तासंमिततयोपदेशयुजे" प्रिय पत्नी आपल्या पतिराजाच्या मनांत ज्याप्रमाणें गोड गोड शब्द बोलून सुविचार भरविते त्याचप्रमाणें काव्याचाही उपयोग होत असतो. हा जो काव्याचा एक हेतु सांगितला जातो तोही या स्तोत्रांत पूर्णपणे सिद्धीस गेलेला आहे.

ज्ञानेश्वरमहाराजांनी म्हटल्याप्रमाणे "वाचे बरवे कवित्व । कवित्वींहि रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व । स्पर्श जैसा" असा हा उत्तरोत्तर उत्कर्षाकडे धांव घेणारा उत्कृष्ट काव्याचा जो स्वभाव तोही या स्तोत्रांत पहावयास सापडेल. आचार्यांच्या शब्दांत कवित्व तर आहेच, पण त्या कवित्वांतही रसिकत्व म्हणजे रसिक जनांच्या चित्ताला आकृष्ट करणारे शृंगार, करुणा, अद्‌भुत आणि शांत इत्यादि विविध रसही ठिकठिकाणी दृष्टीस पडतात. शांतरस हा तर आचार्यांच्या स्तोत्रांतला जणूं कांहीं आत्माच आहे ! शरीरांत जसा आत्मा नांदत असावा त्याप्रमाणें आचार्यांच्या स्तोत्रांत शांतरस हा आपल्या अद्वितीय वैभवाने विराजत आहे.आचार्यांच्या स्तोत्रवाङ्‌मयांत परतत्त्वाला - शिवाद्वैत, शाक्ताद्वैत अथवा ब्रह्माद्वैत कांहीं म्हणा सर्वश्रेष्ठ अद्वैततत्त्वाला सहजच स्पर्श करतां येतो म्हणून आचार्यांच्या या स्तोत्ररूपी काव्याने उत्कर्षाच्या परंपरेची चरम सीमा गाठलेली आहे. या विधानाचे पूर्ण सत्यत्व आपल्याला सौंदर्यलहरी या स्तोत्रांत पहावयास सापडेल. या स्तोत्रांत ओज आहे, प्रसाद आहे, माधुर्य आहे, विविध अलंकार आहेत. इष्ट देवतेची स्तुति करण्याच्या दृष्टीने योजिले शिखरिणीवृत्तही अत्यंत बहारीचे आहे.

आचार्यांचे सौंदर्यलहरी हें स्तोत्र तंत्रशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यांतील प्रत्येक श्कोक मंत्रस्वरूप आहे. प्रत्येक श्लोकांत कांहीं बीजभूत मंत्र अंतर्भूत असतातच. प्रत्येक श्लोकाला पृथक पृथक यंत्रही आहे. त्याची पूजा-अनुष्ठानपद्धति आहे. त्या सर्वांची फलेही पण पृथक पृथक निर्दिष्ट केलेली आहेत. श्रीयंत्र हें तर या स्तोत्रांतील मुख्य यंत्र आहे. श्रीविद्या ही या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. श्रीचक्राच्या निरूपणाच्या मिषाने आपल्या देहालाच श्रीचक्र समजून देहातील षदचक्राचें या स्तोत्रांत विषयसंदर्भानें अत्यंत उत्तम विवेचन केले असून उपासकाची कुंडलिनी कशी जागृत होते व तो कुंडलिनीशक्तीच्या जागृतीने अन्तर्मुख होऊन शिवशक्तिस्वरूपाशी कसा समरस होतो, हाही विषय मोठ्या बहारीने प्रतिपादन केलेला आहे. अष्टांगयोगाच्या अनुष्ठानानें योगी ज्या निर्बीज समाधि-अवस्थेला पोहोंचतो ती अवस्था या स्तोत्राच्या पाठाने, मननानें व निदिध्यासाने उपासकाला प्राप्त होईल अशीच या स्तोत्राची रचना आचार्यांनी मोठ्या कुशलले केलेली आहे. रचना म्हणण्यापेक्षा कांहीं विचारवंत लोक या स्तोत्रालाआचार्यांची स्फूर्तिच मानतात. अशा या स्तोत्राचा लाभ होणे हें एक आपलें मोठे भाग्यच आहे यांत संशय नाहीं. जगज्जननी श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आम्हांला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देऊन कृतार्थ करो हीच तिच्या चरणी आमची अनन्यभावाने प्रार्थना आहे.

अनुष्ठान पद्धतीने या स्तोत्राचा पाठ करावयाचा झाल्यास आचमन आणि प्राणायाम करून देशकाल संकीर्तन करावे. गोत्रोच्चारपूर्वक स्वतःच्या नांवाचा उच्चार करून संकल्प करावा. अस्य श्रीसौन्दर्यलहरी-स्तोत्रमन्त्रस्य गोविन्द ऋषिः अनुष्टुप् छन्दः ।  श्रीमहात्रिपुरसुन्दरीदेवता मम अभीष्टसिध्यर्थे जपे विनियोगः । ॐ ह्रां ॐ ह्रीं याप्रमाणे सहा बीजाक्षरांनी करन्यास आणि हृदयादि न्यास करावेत. ॐ भूर्भुवः सुवरोमिति दिग्बन्धः असें म्हणून दिग्बंध करावा. श्रीगोविन्दर्षये नमः शिरसि । अनुष्टुपच्छन्दसे नमो मुखे । श्रीललितामहात्रिपुरसुन्दरीदेवतायै नमः हृदये । अभीष्टसिद्ध्यर्थे जपे विनियोगाय नमः सर्वाड्रेगषु । अथ ध्यानम् ।

लौहित्यनिर्जित-जपा-कुसुमानुरागां
पाशाङ्‍कुशौ धनुरिषूनपि धारयन्तीम् ।
ताम्रेक्षणामरुण-माल्य-विशेषभूषां
ताम्बूल-पूरित-मुखीं त्रिपुरां नमामि ॥

श्रीललितामहात्रिपुरसुंदरीदेवतायै नमः लं पृथिव्यात्मकं गंधं परिकल्पयामि । याप्रमाणे पंचमानसोपचार पूजा करून मंदस्वराने स्तोत्राचा पाठ करावा. या स्तोत्राचे ऋषि आणि छंद यांविषयी मतभेद दृष्टीस पडतात. कांहीं ग्रंथांत गोविंद ऋषि आणि अनुष्टुपछंद असा उल्लेख आहे, तर कांहीं ग्रंथांत सदाशिव ऋषि आणि जगतीछंद असा उल्लेख आहे. कोठे कोठे ईशानभैरव ऋषि आणि गायत्र्यनुष्टुप् असा दोन छंदांचा जोडीने उल्लेख आहे. या भेदाचें मूळ संप्रदाय भेदांत असावेसें वाटतें. तांत्रिक संप्रदायांत एखाद्या स्तोत्रामध्ये जो मंत्र अभिप्रेत असेल त्या मंत्राचाच छंद त्या स्तोत्राला लावतात असा सामान्यपणे संकेत आहे. प्रस्तुत सौंदर्य-लहरी स्तोत्रांत कादिविद्या, हादिविद्या अथवा पंचदशी, षोडशी इत्यादि स्वरूपाचे अनेक मंत्र अभिप्रेत आहेत. गुरुपरंपराप्राप्त संप्रदायाला अतुलक्षून छंदांचा उल्लेख होणें हें योग्यच आहे. ऋषींच्या बाबतींतही आचार्यांनी या स्तोत्राचे द्रष्ट्टत्व आपल्या गुरूंकडे गोविदयतींकडे दिले असल्याचें दिसत आहे, तर मतभेदाने ते सदाशिवाकडे अथवा ईशानभैरवाकडे मानले जात आहे. आम्ही मात्र श्रीशृंगेरीपीठ अथवा श्रीकांची कामकोटिपीठ या पीठांना अभिप्रेत असलेला शांकरसंप्रदायानुसारी पाठ स्वीकारलेला आहे. असो, आतां पुढील पोस्ट्स्‌मध्ये या स्तोत्राच्या अर्थाचे मनन करूं या.] 

 [ विवेचन - महामहोपाध्याय पं. पांडुरंगशास्त्री गणेशशास्त्री गोस्वामी - सुबोधस्तोत्रसंग्रह]

विवेकचूडामणि - श्लोक १ ला

सर्व-वेदान्त-सिद्धान्त-गोचरं तमगोचरम् ।
गोविंद परमानंद सद्‌गुरु प्रणतोऽस्म्यहम् ॥ १ ॥

वेदान्ताच्या सर्व सिद्धान्तांना गोचर असणारा, परंतु इंद्रिये, अन्य शास्त्रे इत्यादींना गोचर नसणारा, श्रेष्ठ आनंद हे स्वरूप असणारा, असा जो माझा प्रसिद्ध सद्‌गुरु गोविंद, त्याच्यापुढे मी नम्र झालो आहे.

गोविंद नामक सद्‌गुरूपुढे नम्र होऊन आणि त्याला वंदन करून शंकराचार्यांनी येथे मंगल केले आहे. गोविंद ऊर्फ गोविंदयति हे शंकराचार्यांचे गुरू होते. ग्रंथारंभी मंगल केल्यामुळे ग्रंथ निर्विघ्नपणे तडीस जातो अशी पारंपरिक समजूत होती. तिला अनुसरून शंकराचार्यांनी येथे मंगल श्लोक दिला आहे.

परमार्थात सद्‌गुरू हा ब्रह्मरूप मानलेला आहे. ''गुरुः साक्षात् परं ब्रह्म''हे त्याचे खरे स्वरूप आहे, लौकिक शरीर हे त्याचे सत्य स्वरूप नव्हे. ब्रह्म हे सच्चित् आणि परमानंद स्वरूपाचे आहे. येथे ''परमानंद ''गुरू असे म्हणून सद्‌गुरू व ब्रह्म यांचे ऐक्य शंकराचार्यांनी दाखविले आहे.

गुरू म्हणजे अज्ञानरूपी अंधकार दूर करणारा प्रकाश. सद्‌गुरू म्हणजे सत् स्वरूप ब्रह्माचे दर्शन शिष्याला घडविणारा असा अर्थ आहे.

येथे गोविंद शब्दाने सगुण तसेच निर्गुण ब्रह्म सूचित होते. व्यावहारिकदृष्ट्या शंकराचार्यांना सगुण ब्रह्म/ईश्वर मान्य आहे. या ईश्वराचे उल्लेख या ग्रंथात पुढे येतात (श्लोक ३, २३५, ४४७, इत्यादी)

सद्‌गुरू हे सगुण-निर्गुण ब्रह्म हे अगोचर आहे. गोचर म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाच्या टप्प्यात येणारे, अगोचर म्हणजे तसे नसणारे. ब्रह्म हे सगुण असो अगर निर्गुण असो, ते इंद्रियांना कळणारे नाही. तरी सद्‌गुरू/ब्रह्म हे वेदांताच्या म्हणजे उपनिषदांच्या सिद्धांतांना गोचर आहे म्हणजे उपनिषदांतील सिद्धांतावरून ब्रह्म हे कळून येणारे आहे. येथे वेदान्त म्हणजे उपनिषद. उपनिषदे ही वेदाच्या अंत भागी येत असल्याने त्यांना वेदान्त म्हणतात. या उपनिषदांत अनेक ऋषी-मुनींनी ब्रह्माचे ज्ञान दिलेले आहे. उदा., 'ब्रह्म हे सत्य, ज्ञान, अनंत आहे', 'ब्रह्म सह्यिदानद आहे', 'ईश्वर हा जगत्कर्ता आहे', इत्यादी उपनिषदांतील वचनांवरून ब्रह्माचे शाब्दिक ज्ञान होते. वेदांताखेरीज इतर शास्त्रांवरून ब्रह्माचे ज्ञान होत नसल्याने ते त्यांना अगोचर आहे. तसेच प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी ज्ञानाच्या लौकिक प्रमाणांनी ब्रह्म कळत नाही; त्यांनाही ते अगोचर आहे.

या मंगल श्लोकात 'विवेकचूडामणि' या ग्रंथाचे तसेच केवलाद्वैत वेदांताचे चार अनुबंध सुचविले आहेत असे काहीजण म्हणतात. अनुबंध म्हणजे एखाद्या शास्त्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आवश्यक मानले गेलेले चार घटक पुढील प्रमाणे :

(१) अधिकारी : त्या त्या शास्त्राचा अभ्यास करण्याची पात्रता असणारा जिज्ञासू, (२) विषय : त्या शास्त्राचा विषय, (३) संबंध : शास्त्राचा विषय आणि ग्रंथ यात संबंध असणे. उदा. शरीर हा शरीरशास्त्राचा विषय; पृथ्वी हा शरीरशास्त्राचा विषय नव्हे, (४) प्रयोजन : त्या शास्त्राच्या अध्ययनाने प्राप्त होणारे फळ. या श्लोकात 'प्रणत पुरुष' हा अधिकारी मानावयास हवा, 'सद्‌गुरू परमानंद आहे' या वाक्यावरून जीव-ब्रह्मैक्य हा विषय सूचित होतो (श्लोक ५८ पहा ). 'परमानंद प्राप्ती' हे प्रयोजन आहे (श्लोक ४६). विषयाचे प्रतिपादन करणारा विवेकचूडामणि हा ग्रंथ असल्याने, 'प्रतिपाद्य-प्रतिपादक' असा संबंध येथे आहे. हे चारही अनुबंध या मंगल श्लोकात आहेत हे दाखविण्यासाठी शब्दार्थांची ओढाताण करावी लागते हे मात्र खरे.

सौन्दर्यलहरी श्लोक १० वा

सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः प्रपञ्चं सिञ्चती पुनरपि रसाम्नाय-महसः । अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं स्वमात्मानं कृत्वा स्...